Kolhapur : श्री अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मंदिरासमोरील गरुड मंडप उतरवल्याने त्यानंतरचे दोन्ही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाले आहेत. त्यामुळे नव्याने बांधकाम होण्यापूर्वी मंडपाच्या कमानीची रुंदी वाढवणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले आहे.

तब्बल २०० वर्षांनंतर गरुड मंडप उतरवला आहे. आता संधी आहे तर कमानीची रचना थोडी बदलली की किरणोत्सवातील हा अडथळा कायमचा दूर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

अंबाबाईच्या किरणोत्सवात येत असलेल्या अडथळ्यांमध्ये गरुड मंडप कमानीचादेखील एक अडथळा आहे. कोणत्याही कारणाने गरुड मंडप उतरवावा लागला असला तरी आता त्यामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत आहे, हे नाकारून चालणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणि आत्तादेखील प्रखर सूर्यकिरणे देवीच्या मुकुटाच्या वरपर्यंत गेली आहेत. हा गरुड मंडप उतरविल्याचा परिणाम आहे.

आता गरुड मंडपाचे नव्याने बांधकाम होणार आहे. कमानीची रचना बदलण्याची हीच संधी आहे. कमान थोडी रुंद केली तरी अडथळा दूर होणार आहे, याचा देवस्थान समितीने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे.

तारखांमध्ये झाला बदल

अंबाबाईच्या किरणोत्सवांच्या तारखांमध्ये काळानुरूप थोडा बदल झाला आहे. दक्षिणायन म्हणजेच नोव्हेंबरमधील किरणोत्सवाच्या तारखा दोन दिवसांनी पुढे गेल्या आहेत. म्हणजेच हा सोहळा ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होत आहे; तर उत्तरायण किरणोत्सव दोन दिवस आधी म्हणजे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 05-02-2025