रत्नागिरी : ‘कंत्राटी’ अभावी शाळांचे भवितव्य धोक्यात

रत्नागिरी : जिल्ह्यात शासन निर्णयानुसार ४९५ शिक्षकांची कंत्राटी भरती झाली. परंतु, शासनाने आता त्यांची नोकरी नवीन शिक्षक येईपर्यंत किंवा या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीपर्यंत राहणार आहे. तसा शासनाने निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शिक्षकांचे भवितव्य अधांतरी आहे. परंतु, यासंबंधी सर्व आमदार, मंत्र्यांपर्यंत निवेदने दिली असून, अधिवेशनात यासंबंधी शासनाने नोकरीत कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कंत्राटी शिक्षकांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला सुदर्शन मोहिते, सुशांत मुंडेकर, गिरीश जाधव, संजय कुळे, मृदुला देसाई, योगेश तांबे, विनोद कांबले, मनीषा चाचे आणि शिक्षक नेते दिलीप देवळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सुदर्शन मोहिते म्हणाले की, जिल्हा परिषदेने ४९५ शिक्षकांची नियुक्ती केली. १० फेब्रुवारीला कंत्राटी शिक्षक रद्द करण्याचा निर्णय झाला, परंतु, रत्नागिरी जिल्हात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या होत असतात. बदल्या केल्यानंतर सुमारे १००० पदे रिक्त झाली. त्यावेळी डी. एड., बी. एड., कंत्राटी शिक्षक, पदवीधर शिक्षकांच्या मदतीने जिल्हा परिषदेने शिक्षणाचा गाडा हाकला, अन्यथा शाळा बंद पडण्याची भीती होती.

३५० शिक्षकांच्या नियमित बदल्या करण्यात आल्या. पुन्हा शाळा अडचणीत सापडल्या. काही शाळांमध्ये शिक्षक नव्हते, एकशिक्षकी शाळा झाल्या. रत्नागिरी जिल्हा दुर्गम आहे.

अशा स्थितीत शिक्षकांची संख्या आणि शाळांची स्थिती हे प्रमाण जुळू शकत नाही. २५ टक्के रिक्त पदांवरून २८ टक्क्यांवर शिक्षकांची संख्या आली. राज्यातले निर्णय बहुतांशी वेळा रत्नागिरी जिल्ह्यासाठी फायदेशीर नाहीत, त्यामुळे या जिल्ह्याला स्वतंत्र निकष लावून भरती करावी व शाळा चालू राहिल्या पाहिजेत, याकरिता आमचा प्रयत्न आहे.

मंडणगड तालुक्यात ३०, दापोली १७, खेड ५५, गुहागर ४०, चिपळूण, ८०, संगमेश्वर, लांजा ४५ राजापूर ६०, रत्नागिरी ५४ आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळेत ५ कंत्राटी शिक्षक कार्यरत आहेत. कंत्राटी शिक्षकांना १५ हजार रुपये वेतन मिळते. परंतु, आज हे शिक्षक नसल्यास शाळा बंद पडू शकतात. ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे कंत्राटी शिक्षकांसंबंधी तातडीने शासनाने निर्णय घ्यावा. शिवाय हे सर्व शिक्षक स्थानिकच आहेत. त्यामुळे शासनाने निर्णय घेणे आवश्यक आहे.

वेतनाचा विचार नाही
वेतनाचा कोणताही विचार न करता मुलांसाठी शिक्षक काम करत आहेत. स्थानिक ठिकाणी नोकरी मिळाल्याने हे कंत्राटी शिक्षक जीव ओतून काम करत आहेत. शून्य, एक शिक्षक किंवा फक्त रोस्टरवर शिक्षक ठेवून शाळा टिकणार नाहीत. त्यासाठी कंत्राटी शिक्षकांची भरती अत्यावश्यक आहे, असे मत कंत्राटी शिक्षकांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 03/Mar/2025