मंडणगडात २७५ माकडांना पकडून वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात

मंडणगड : शहरातील नागरीक व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा माकडांचा उपद्रव लक्षात घेऊन वनविभागाचेवतीने 28 फेब्रुवारी 2025 पासून मंडणगड तालुक्यात माकडे पकडण्यासाठी विशेष अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात तालुक्यात माकडांची संख्या अधिक असलेली ठिकाणे शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माकडांना शेंगदाणे केळी या सारख्या खाद्य पदार्थांची लालच दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात येते. पिंजऱ्यातील माकडांना त्यांच्या नैसर्गीक अधिवासात सुरक्षीत सोडण्यात येते.

3 मार्च 2025 रोजी मंडणगड शहरातील गांधी चौक येथे पिंजरा लावून 50 माकडे पिंजऱ्यात पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मोहीमेत आत्तापर्यंत तालुक्यातील सोवेली, वेळास बाणकोट, वेसवी, उमरोली शिपोळे या गावात अभियान राबवून 275 माकडांना पकडून त्यांचे अधिवासात सोडण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळुण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग रत्नागिरी प्रियांका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी दापोली प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम तालुक्यात राबवण्यात येत असून तालुक्यात आठ दिवस हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

गांधी चौकी मंडणगड येथील कार्यक्रमात वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओमकार तळेकर, अमोल बिन्हाडे, समाधान गिरी, व सहकारी श्री. पाटील सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी नगराध्यक्षा अॅड, सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, राहुल कोकाटे यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित राहून वनविभागाने राबविलेल्या मोहीमेबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 04/Mar/2025