राजापूर : पाचल-तळवडे पूल मोजतोय अखेरची घटका..

राजापूर : पूर्व तालुक्यातील पाचल तळवडे जोडणाऱ्या जीर्ण पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याबाबत केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच राहिली आहे. तीन वर्षांपूर्वी इालेल्या अतिवृष्टीनंतर अर्जुनेला आलेल्या महापुरात या पुलाची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली असली तरी अखेरची घटका मोजत असलेल्या या पुलाच्या जागी नवीन पूल बांधणे अवश्यक बनले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात होत असलेल्या अतिवृष्टीनंतर कमी उंची असलेल्या पाचल तळवडे पुलावरून अर्जुनेच्या पुराचे पाणी वाहते. त्यामुळे होणारी वाहतूक प्रदीर्घकाळ बंद असते. परिणामी, पाचलशी वाहतुकीचा संपर्क तुटतो. हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सन २०२१ ला सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी अर्जुना नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडविला होता. त्याचा पाचल तळवडे पुलाला मोठा दणका बसला होता.

महापुरातून वाहून आलेल्या लाकडांचे मोठमोठे ओडके आदळल्यामुळे पुलाचे संरक्षण कठडे वाहून गेले होते. पुलावर खड्डे पडत भाग तर खचला होता. परिणामी पाचलकडून तळवडे, ताम्हानेसहित जामदा परिसराकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती. दरम्यान पूल खचल्याने वाहतुकीसाठी तो काही दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुलाची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली गेली. मोठे खड्डे बुजविण्यात आले. उर्वरीत पावसाळ्यात पुलाला धोका नसल्याची खात्री केल्यानंतरच पुन्हा पूल बाहतुकीस खुला करण्यात आला होता.

त्या कालावधीत लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुलाची पहाणी करीत त्या जागी जास्त उंचीचा नवीन पूल बांधण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुमारे चार कोटी अंदाजपत्रकाचा आराखडा तयार करण्यात आला आणि तो शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी पुढे काहीच हालचाल न झाल्याने पुलाचा प्रश्न अधांतरीच आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 06/Mar/2025