चिपळूण : शहरातील खेंड कांगणेवाडी येथे दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्याने पाच घरांसह एका बहुमजली इमारतीला धोका निर्माण झाला आहे. दरडीच्या वरच्या बाजूस असलेल्या तिन्ही घरांतील रहिवाशांना तातडीने स्थलांतरित करण्यात आले. ही घटना शनिवारी (ता. ५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घटनास्थळी पाहणी केली. गेल्या चोवीस तासांत तालुक्यात ६१.२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेले दोन दिवस चिपळूण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खंड कांगणेवाडी येथे दरड आणि संरक्षक भिंतदेखील कोसळली आहे. एकाच ठिकाणी दोन सरंक्षक भिंती पालिकेकडून उभारण्यात आल्या होत्या. २००२ मध्ये व त्यानंतर २००५ मध्ये देखील या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली होती. त्यावर उपाययोजना म्हणून लाखो रुपये खर्चातून संरक्षक भिंत उभारण्यात आली होती; मात्र अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच संरक्षक भिंतीसह दरडही खाली आली आहे. या दरडीच्या वरच्या भागात व पायथ्यालाही दाट वस्ती आहे. दरडीच्या वरील भागात जाधव, राणिम आणि शिंदे यांची घरे असून, त्यांना तातडीने घर खाली करून स्थलांतरित केले आहे. तसेच दरडीच्या खालील बाजूस यतीन कानडे, प्रभूलकर यांची घरे असून, त्यालगत बहुमजली अपार्टमेंट आहे. त्यालाही धोका असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत साहित्य हटवण्याचे कामकाज सुरू होते.
कोणताही पर्याय राहिलेला नाही
या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी भोसले, नगर अभियंता दीपक निंबाळकर, वैभव निवाते, बापू साडविलकर आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सद्यःस्थितीत पावसाचा जोर कायम असल्याने संबंधित संबंधित कुटुंबांच्या स्थलांतराव्यतिरिक्त कोणताही पर्याय राहिलेला नाही; मात्र पावसाचा जोर कमी होताच या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 07/Jul/2025














