चिपळूण : येथील एसटी आगारात चालक-वाहक आणि वाहतूक नियंत्रकांची अपुरी संख्या, इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे चिपळूण आगाराचे वेळापत्रक विस्कटले आहे.
चालक-वाहकांअभावी आगाराच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असून, अनेक बसफेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगार प्रशासनावर येत आहे. काही फेऱ्या दररोज विलंबाने धावत आहेत त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी चिपळूणच्या अनेक मार्गावरील बसफेल्या विलंबाने धावत होत्या.
येथील बस्थानकातही सोयीसुविधांचा अभाव आहे. नव्या बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे अपुरी बैठक व्यवस्था त्यात पावसाचा त्रास सहन करत प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षेत तासनतास उभे राहावे लागते. बसस्थानकात पोलिसचौकीही नाही. शौचालयातही दुर्गंधीची समस्या वारंवार निर्माण होत असते. बसस्थानक आवार खासगी वाहनांचे पार्किंगस्थळ बनले आहे. दुचाकीसह चारचाकी वाहने एसटीच्या आवारात लागलेल्या असतात. याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आणखी ३५ बस, ४० कर्मचारी हवेत
या आगारातून दररोज ३१२ बसफेऱ्या धावतात. चिपळूण आगारात ११० बस उपलब्ध आहेत. अजून ३५ बसची आवश्यकता आहे. एकूण कर्मचारी संख्या ४०० पर्यंत आहे. त्यात चालक आणि वाहक २००च्या आसपास आहेत. ४० कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. बाचा परिणाम आगाराच्या प्रवासी वाहतूक सेवेवर होत आहे. चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने या आगारात कर्मचाऱ्यांच्या रिबूक ड्युटीचे प्रमाण वाढले आहे. (रिबूक म्हणजे चालक-वाहक एक ड्यूटी केल्यानंतर त्यांना दुसरी ड्यूटी लावली जाते.) मात्र बऱ्याचदा काही कर्मचारी डबल ड्यूटी करण्यास तयार नसतात. पर्यायी कर्मचारीच नसल्याने काही बसफेऱ्या अचानक रद्द करण्याची वेळ येते.
पोफळी बस पाच दिवस अचानक रद्द
अनेकदा वेळेत बस नसल्याने खासगी वाहनांचा आधार घेत प्रवाशांना घर गाठावे लागते, यात त्यांची मोठी आर्थिक परवड होते. चिपळूण – पोफळी मार्गावर सायंकाळी धावणारी बसफेरी तर गेल्या पंधरा दिवसांत चार ते पाच दिवस अचानक रद्द करण्यात आली. कधी कधी ही फेरी उशिराने धावते. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. ही फेरी नियमित करावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांमधून केली जात आहे.
आगारात चालक-वाहक व कर्मचारी संख्या कमी आहे. याबाबत आगाराकडून वरिष्ठ पातळीवर मागणी करण्यात आली आहे. आगारातून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज उत्तमपणे करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही दिवस गैरसोयीचे आहेत, प्रवाशांनी सहकार्य करावे- दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 07/Jul/2025














