पाली बाजारपेठ रस्त्यावर खड्डे; वाहतुकीस अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर होणार कारवाई

पाली : मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पालीमध्ये चौपदरीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, या कामांमुळे पाली बाजारपेठेतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. तसेच रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्त पडलेले सामानही तत्काळ काढून घ्यावे. या मार्गावर अडथळा करणारे फेरीवाले, रिक्षा व टेम्पो यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली विभागात शांतता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पाली पोलिस दूरक्षेत्र येथे समन्वय बैठक घेण्यात आली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

पाली हे दोन महामार्गावरील प्रमुख ठिकाण आहे. सध्या चौपदरीकरणाची कामे सुरू असल्याने गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतूक वाढते. त्यामुळे अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी येथील व्यावसायिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. पाली बसस्थानक, बाजारपेठेत व सेवा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभ्या करू नयेत. तसेच खासगी बस तथा ट्रॅव्हल्स ठरवून दिलेल्या जागेवरच उभ्या कराव्यात, रस्त्यावर गर्दी होईल अशा ठिकाणी उभ्या करू नये, अशा सूचना दिल्या. किरकोळ फेरीवाल्यांनीही आपली दुकाने अडथळा होतील अशी लावू नयेत. तसे केल्यास कडक कारवाई केली जाईल. या वेळी पाली पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक मोहन कांबळे, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल तृप्ती सावंतदेसाई, हेडकॉन्स्टेबल उदय बांगर, कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील, दर्शना शिंदे, पाली सरपंच विठ्ठल सावंत, नाणीज सरपंच विनायक शिवगण, साठरेबांबर सरपंच तृप्ती पेडणेकर, पोलिस पाटील, पाली व्यापारी संघटना, किरकोळ विक्रेते व फेरीवाले, रिक्षा आणि टेम्पो चालक-मालक संघटना, खासगी बस मालक, महामार्ग ठेकेदार कंपनी ईगल इन्फ्रा व रवी इन्फ्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पार्किंगचे फलक लावा
गणेशोत्सव काळात आठवडाबाजाराच्या दिवशी व इतर दिवशी दुकाने लावण्यासाठी वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा जागा निश्चित करून ग्रामपंचायत प्रशासनाने तिथे व्यावसायिकांनी नियोजन करुन द्यावे. त्याठिकाणी बाजारपेठेत नो पार्किंग व पार्किंगचे फलक लावावेत, अशा सूचनाही पोलिस प्रशासनाने केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 11/Aug/2025