रत्नागिरी : महावितरणाचे सुमारे ४ कोटींचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये उच्चदाबाचे ३६७ विद्युतखांब बाधित झाले; तर लघुदाबाचे १ हजार ३२० बाधित झाले असून, ७१ रोहित्रे बंद पडली. यामध्ये महावितरण कंपनीचे सुमारे ४ कोटी ७ लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पावसामध्ये तारेवरची कसरत करत, धाडसी कामगिरी दाखवत जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी विद्युतपुरवठा पूर्ववत केला.

गेले चार दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यामध्ये अनेक नद्यांना पूर आला, शहरामध्ये पाणी भरले. झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युतखांब कोसळले, मुख्य वाहिन्या तुटल्या. रोहित्र खराब होऊन विविध भागांतील गावं अंधारात गेली; परंतु महावितरण कंपनीने सजगता दाखवत त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केली. यामुळे अनेक भागामध्ये विद्युत्पुरवठा पूर्ववत झाला. संगमेश्वर तालुक्यात ज्या ठिकाणी दोष होता त्या ठिकाणी पाणी भरल्याने पोहोचता येत नव्हते म्हणून २१ तास काही भाग अंधारात गेला; परंतु येथे देखील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करायला हवे. त्यांनी खासगी बोट घेऊन बोटीतून जाऊन त्या विद्युतखांबावर चढून दुरुस्ती केली.

या पावसाचा महावितरण कंपनीला मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात एकूण ३६७ उच्चदाब विद्युतखांब बाधित झाले. त्यापैकी ३३३ पूर्ववत करण्यात आले असून, ३४ शिल्लक आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त ७४ खांब होते तर लघुदाब १ हजार ३८० खांब बाधित झाले. त्यापैकी १ हजार ३२० पूर्ववत करण्यात आले. ६० शिल्लक आहेत तर ७३ रोहित्रे खराब झाली. त्यापैकी ७१ रोहित्र पूर्ववत करण्यात आली असून, २ शिल्लक आहेत. यामध्ये महावितरण कंपनीचे ४ कोटी ७ लाखांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 21/Aug/2025