गणेशोत्सवासाठी रानफुलांचा सजला साज!

राजापूर : गणेशाच्या आरासासाठी वापरल्या जाणाऱ्या निसर्गातील विविधांगी पानफुलांकडूनही साऱ्यांना गणेशाच्या आगमनाचे संकेत दिले जात आहेत. रानफुलांनी डवरलेल्या श्रावणातील निसर्गामध्ये बहरलेला रानतिरडा, सोनतळ, कळलावी, पांढऱ्या शुभ्र पानांची सारवड, कवंडल (जंगली पडवल) सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गाचा दैवी देणगी लाभलेल्या कोकणच्या निसर्गाने श्रावणामध्ये सध्या सौंदर्याचे वेगळे रूप आपलेसे केले आहे. अन्यवेळी शुष्क दिसणाऱ्या कातळाने सध्या हिरवागार शालू अंगावर पांघरला आहे. त्या हिरव्या गालिचावर इवलीशी निळी, जांभळी, पांढरी रंगबेरंगी फुले साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गणेशोत्सवामध्ये त्याच्या आरासासाठी विविध वनस्पतींच्या फुलांची आरास करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये विशेषकरून पिवळ्यागडद रंगाच्या सोनतळीपासून तीन रंगांचा असलेला रानतिरडा, आयुर्वेदिक औषध म्हणूनही ज्याचा उपयोग केला जातो त्या कळलावी आदी फुलांचा समावेश आहे. त्याच्या जोडीला कवंडल या फळासह केवळ हिरव्या आणि पांढऱ्या रंगांच्या पानांच्या सारवडचाही उपयोग केला जातो. गणेशोत्सवाच्या आरासासह सजावटीसाठी वापरण्यात येत असलेली ही रानफुले आणि वनस्पतींची पाने बहरली आहेत. श्रावण महिन्यामध्ये बहरलेले हे निसर्गसौंदर्यही लाडक्या गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पत्रीलाही महत्त्व
गणेशपूजनासाठी पत्रीला विशेष महत्त्व आहे. यामध्ये दूर्वा (पांढऱ्या), पिंपळ, तुळस, शमी, आघाडा, आपटा, कडुलिंब, बेल, केतकी, जाई, चाफा, आंबा, अशोक, फाल्गुनी, देवदार, तिंटणी, बोर, नीळ, भृंगराज आणि अळू यांचा समावेश असतो. प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे औषधी गुणधर्म असून, या पत्री अर्पण करण्याने गणेशाला प्रसन्न तर होतेच; परंतु आरोग्याच्यादृष्टीनेही ते फायद्याचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 25/Aug/2025