दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग – राजेश क्षीरसागर

रत्नागिरी : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांसाठी कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळाने ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.

यात वर्षभराच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे महिनानिहाय, सूत्रबद्ध नियोजन देणारी एक समग्र कार्यप्रणाली देण्यात आली आहे. प्रशासकीय शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक संस्कार या तीन स्तंभांवर उपक्रम आधारित असून, याचा उपयोग परीक्षा नियोजनात होणार आहे.

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम कार्यान्वित झाला. त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गसह सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुख्याध्यापक, शाळा प्रमुखांच्या बैठका घेतल्या. कोकण व कोल्हापूर मंडळाने मागील अनेक वर्षे निकालात अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान टिकवून ठेवले आहे. मागील वर्षी कोल्हापूर विभागात एकही कॉपी प्रकार आढळला नाही तर कोकणात केवळ एक प्रकार वगळता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात यश मिळवले.

या पार्श्वभूमीवर ही कार्यप्रणाली अधिक प्रभावी ठरणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे यात प्रशासकीय काम, शैक्षणिक कार्य आणि विशेष उपक्रम या तीन स्तंभांचे एकाच ठिकाणी महिनानिहाय संकलन केले आहे. यामुळे कामांचे योग्य विभाजन होते आणि ऐनवेळी होणारी धावपळ टळते.

विभागीय मंडळाकडून दरमहा पाठपुरावा बैठका घेऊन अंमलबजावणीत सातत्य राखणे आणि जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा तयार झाली आहे. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर अशा दोन विभागात कामे विभागली आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना डिसेंबर-जानेवारीमध्ये सराव प्रश्नपत्रिका, पूर्वपरीक्षा आणि उजळणीसाठी पुरेसा वेळ मिळेल. या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

कॉपीमुक्ती प्रभावी
‘कॉपीमुक्ती’ला केवळ प्रशासकीय नियम न ठेवता, ती प्रामाणिकपणाचे मूल्य रूजवणारी एक सकारात्मक सामाजिक चळवळ बनवण्यासाठी सप्टेंबरमध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा शपथ’ आणि जानेवारीमध्ये ग्रामसभेत जनजागृतीसारखे उपक्रम अनिवार्य केले आहेत. विशिष्ट महिन्यांमध्ये ताणतणाव व्यवस्थापन अनिवार्य शिबिरे, ‘हसतमुखाने परीक्षा मोहीम’ आणि मोबाईलचा मर्यादित वापर यावर भर देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यावर भर दिला आहे. नियमित अध्यापनासोबतच घटक चाचण्या, सत्रपरीक्षांचे विश्लेषण आणि मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापनावर भर देण्यात येणार आहे.

हा आराखडा उत्कृष्ट असला तरी त्याचे यश केवळ कागदावर अवलंबून नसून, तो योग्य वेळेत, योग्य पद्धतीने आणि संपूर्ण निष्ठेने अंमलात आणण्यावर अवलंबून आहे. – राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 13-10-2025