Harshvardhan Sapkal: अजित पवारांना भसम्या झालाय, कितीही खाल्लं तरी आणखी खावंसं वाटतंय; सपकाळांचा हल्लाबोल

Harshvardhan Sapkal on Ajit Pawar : पुण्यात 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या (Pune Parth Pawar land scam) कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या सर्व कंपनीची बँक अनुषंगाने चौकशी केली तर मोठे हादरे बसल्याशिवाय राहणार नाहीत. पुण्याचे पालकमंत्रीपदच स्वतःच्या परिवाराचे चांगभले करण्यासाठी घेतले आहे, असे म्हणत सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांना भसम्या आजार झाला आहे. कितीही खाल्लं तरी आणखी खावंसं वाटतं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

70 हजार कोटी रुपयांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्वांना जेलमध्ये टाकू असे सांगितले होते

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांनी जैन मंदिराच्या जमिनीला विकून केलेला व्यवहार, हा भ्रष्टाचार संपत नाही तोच आता पुण्यात दुसरे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. 70 हजार कोटी रुपयांच्या पार्श्वभूमीवर भोपाळ येथे नरेंद्र मोदी यांनी सर्वांना जेलमध्ये टाकू असे सांगितले होते. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबद्दल चक्की पिसिंग अँड पिसिंग म्हटले होते. त्यांनाच मंत्री मंडळात सामील करुन घेतलं आहे. हे पब्लिक डोमेन मधील प्रकरण आहे. भ्रष्टाचार झाला हे मान्य करुन सरकारने दोन अधिकाऱ्यांना निलंबित देखील केले आहे असे सपकाळ म्हणाले.

भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे या विषयांचे आका

भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे या विषयांचे आका आहेत. एवढे प्रकरण समोर येते आहे. काँग्रेस निवेदन देते आहे, त्यावर आम्ही भाष्य करतो आहे. पण हे ऐरणीवर का येत नाही, एरणीवर येण्याकरिता महायुती मधील धुसफूस यातूनच हे सर्व बाहेर येणार का? हा प्रश्न माध्यमांना आणि सर्व नागरिकांना आहे असंसपकाळ म्हणाले. मुलांना सत्तेत राहून अनेक अनियमितता करण्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. इतके खाऊन देखील पोट भरत नसेल तर भसम्या झाला नाहीत तर काय म्हणणार असेही सपकाळ म्हणाले.

नेमकं प्रकरण काय? (Pune Parth Pawar Land)

1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 07-11-2025