रत्नागिरी : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘सागर महोत्सव -SEAVERSE’ या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी जैवविविधतेचा अभ्यास, तज्ज्ञांची व्याख्याने, निसर्गभ्रमंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समुद्राबद्दल जागरूकता व सहभाग वाढवणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आसमंत फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन व संचालक जगदीश खेर यांनी दिली.
१५ जानेवारी २०२६ रोजी अभ्यासफेऱ्यांद्वारे महोत्सवाची सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी लवकर खारफुटी जंगलाची अभ्यास फेऱ्यांचे आयोजन केले असून तज्ज्ञ हेमंत कारखानीस व शांभवी चव्हाण यांच्या सोबत सहभागी खारफुटी व किनारी परिसंस्थेचा अभ्यास करतील. कर्ला जेटी येथून दोन बोटींद्वारे फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण एका फेरील ९० मिनिटे एवढा कालावधी लागतो. प्रथम आलेल्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार आहे.
यानंतर सायंकाळी खडकाळ किनारा अभ्यास फेरीचे आयोजन असून प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली भाटकरवाडा परिसरातील शैवाळ, खडकाळ किनारा आदींचा अभ्यास होणार आहे.
१६ जानेवारी रोजी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सकाळी ९ वाजता मुख्य अतिथी म्हणून डॉ. शैलेश नायक यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. मान्यवरांमध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक, पर्यटन विभागाचे सचिव, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचा समावेश असेल. उद्घाटनाच्या दिवशी विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक डॉ. बबन इंगोले “समुद्री खनिजसंपत्ती आणि जैवविविधतेवरील परिणाम” यावर विचार मांडतील. प्रसिद्ध सागरी पर्यावरणशास्त्र आणि संवर्धनतज्ज्ञ डॉ. दीपक आपटे यांची मुलाखत होईल. यात डॉ. अमृता भावे त्यांच्याशी संवाद साधतील.
फर्ग्युसन महाविद्यालय (पुणे) आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी) यांच्या विद्यमाने जबाबदार पर्यटनावरील लघुपट व स्ट्रीट प्ले दाखवला जाईल. डॉ. संतोष शिंत्रे यांचे “पर्यावरण संप्रेषण” या विषयावर व्याख्यान होईल. तसेच डॉ. ईशा बोपर्डीकर “सागरी सस्तन प्राणी” या विषयावर सादरीकरण करतील.
१७ जानेवारी रोजी सकाळी भाट्ये समुद्रकिनारी पुळणी किनारा अभ्यास फेरी आयोजित केली असून तज्ज्ञांच्या सहभागाने उपस्थितांना मार्गदर्शन होईल. यामध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. नरसिंह ठाकूर “सागरी संशोधन ते उद्योगविश्व” या विषयावर मार्गदर्शन करतील.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ समीर डामरे “महासागरातील निर्जीव संसाधने” या विषयावर सादरीकरण करतील. जबाबदार पर्यटनावरील लघुपट दाखवला जाईल. वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर मांडे यांचे “हवामान बदल आणि जनसहभागाची भूमिका” या विषयावर व्याख्यान होईल. भाटकरवाडा येथे खडकाळ किनारा अभ्यास फेरी होणार आहे. यावेळी डॉ. अमृता भावे आणि प्रदीप पताडे मार्गदर्शन करतील.
१८ जानेवारीला दिवसाची सुरुवात पुन्हा भाट्ये येथील पुळणी किनारा अभ्यास फेरीने होईल. मुंबई विद्यापीठाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख “दि ओशन विधीन अस (The Ocean Within Us) : आपल्या आतला महासागर स्वप्नातला, सर्व जीवनाला आधार देणाऱ्या अनंत निळ्या रंगाचा शोध घ्या आणि त्याचे रक्षण करा” या विषयावर सादरीकरण करतील.
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार या “जबाबदार पर्यटन” (Responsible Tourism) या विषयावर व्याख्यान देतील. भोजन अवकाशानंतर दुपारी ‘संगीत कुर्माख्यान’ हे मॅग्रोव्ह फाउंडेशनचे लोकनाट्य सादर केले जाईल. यानंतर समुद्रकिल्ल्यांच्या वन्यजीव सर्वेक्षणाचा अनुभव, सहभागींना बक्षीस वितरण, तसेच महोत्सवाचा अधिकृत समारोप करण्यात येईल.
संपर्क :
Aasamant Benevolence Foundation
Email: info@aasamant.org
Website: www.aasamant.org
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:31 PM 12/Dec/2025












