गुहागर : गवतारु गोठ्यांमुळे ग्रामीण जीवनशैलीचे अस्तित्व टिकवून
गुहागर : पूर्वी ग्रामीण भागाच्या जीवन शैलीमध्ये छोटसं मापाच किंवा गवतारू घर आणि सोबत गवतारू जनावरांचा गोठा असायचा. शेतीबरोबर प्रत्येकाकडे पशुधन असायचे. परिणामी गवतारू गोठे घराशेजारी असत; मात्र बदलत्या जीवनपद्धतीमुळे घरांची रचना बदलली आणि गुरांचे गोठे कमी झाले. परंतु आजही काही गावातून जुन्या जीवन शैलीची आठवण करून देणारे गवतारू गोठे आपले अस्तित्व टिकवून आहेत.
पूर्वी गावात मापाचं घर, गवतारू घर, घरासमोर अंगण, उन्हाळ्यात लाकडी मेढी आणि बांबू वापरून घातलेला मांडव, मागे परसावण, पावसाळ्यात घराच्या ओसरीला अंगणासाठी वापरलेले सामान, परसात आंघोळीसाठी प्लास्टिकचे कागद वापरून काढलेले छोटेसे छप्पर अशी रचना असे. या सोबत प्रत्येक शेतकऱ्यांचा गुरांचा गोठा असे. हा गोठा गवतारू स्वरूपाचा असे. त्याला आता सारख्या चिरेबंदी भिती नव्हत्या. त्यावेळी झाडाच्या फांद्यांपासून तयार केलेले झडप किंवा ग्रामीण भाषेतील सलदे वापरले जायचे, जनावरांच्या गोठ्याच्या बाजूला शेण टाकण्यासाठी खास जागा असायची आता बदलत्या काळात सारेच बदलले आहे. संपूर्ण खेडेगावातील जीवन पूर्वपेक्षा झपाट्याने प्रगतीकडे जात आहे.
मात्र यामध्ये कुठे तरी खेडे गावातील पूर्वजांची त्याकाळी असलेली जगण्याची पद्धत स्पर्धेच्या युगात नामशेष होताना दिसते. पशुधन हे आता गावात कुणाकडे व्वचितच बघायला मिळते. आता गवतारू गोठ्यांची जागा चिरेबंदी गोठ्यांनी घेतली आहे. जुन्या आठवणी आणि जीवनशैली याची माहिती संकलित करून नवीन पिढीला तो अनमोल ठेवा देण्याची आज गरज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 20/Jun/2024
What's Your Reaction?