रखडलेल्या कामांमुळे लांजावासीयांची तहसील कार्यलयावर धडक
![रखडलेल्या कामांमुळे लांजावासीयांची तहसील कार्यलयावर धडक](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_667555d8df8fc.jpg)
लांजा : लांजा शहरात रखडलेल्या सर्व्हिस रोड, गटार आणि पाईपलाईनच्या कामावरून लांजा तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत लांजावासीयांनी ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ही काम होत नसतील तर सर्वच काम बंद ठेवा, असा आक्रमक पवित्रा लांजावासीयांनी घेतला, दरम्यान पुढील आठ दिवसांत ही कामे मार्गी लावण्याची डेडलाईन महामार्ग अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना देण्यात आली.
लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, सध्या पावसाळ्यात सुरु असलेल्या कामांमुळे लांजावासीयांना चिखलातून पायपीट करावी लागत आहे. पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय लांजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लांजा तहसीलदार प्रमोद कदम, महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. पी. कुलकर्णी, सल्लागार अधिकारी प्रशांत पाटील, ईगल इन्फ्रा कंपनीचे जयंतीलाल, सितलानी तसेच लांजा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी हर्षला राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते.
लांजा शहरातील रखडलेल्या पाईपलाईन, गटाराचे काम आणि सर्व्हिस रोड यावरून उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामध्ये राष्ट्रवादीचे अभिजित राजेशिर्के, बाबा लांजेकर, नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेवक सचिन डोंगरकर, अनंत आयरे, व्यापारी संघटनेचे कुमार बेंडखळे, संजय यादव, प्रकाश लांजेकर, प्रवेश घारे, मिलिंद उपशेटचे, बाबा धावणे, प्रसाद डोर्ले लहू कांबळे आदींनी हायवे प्रशासन अधिकारी व महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्यावर प्रश्नाचा भडिमार केला.
नळ कनेक्शनही तुटले
रखडलेल्या सर्व्हिस रोडमुळे सध्या नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याचप्रमाणे महामार्ग ठेकेदार कंपनीने गटारांचे काम केले नसल्याने पावसाचे पाणी हे नागरिकांच्या घरे आणि दुकानात घुसून त्यांचे नुकसान होत आहे. गटारांअभावी अन्य समस्या देखील उद्भवत आहेत. सध्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. यामुळे अनेक नागरिक आणि व्यापारी वर्गाचे नळ कनेक्शन तुटले असून याबाबत वारंवार सांगूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
या सर्वच मुद्दांवर उपस्थित नागरिकांनी हायवे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार करून जेरीस आणले. ठेकेदार आणि महामार्ग अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कामांमुळे लांजावासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवक सचिन डोंगरकर यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षापासून कुबे वेथील नागरिकांना भूसंपादनाचा मोबदलादेखील मिळाला नाही.
दरम्यान, पुढील आठ दिवसांत लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे ते लांजा कोर्ले फाटापर्यंत महामार्गाच्या साईड सर्व्हिस रोड, गटार व पाईपलाईनचे काम पूर्ण करून देण्याची मुदत महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली, तर पुढील आठ दिवसात काम पूर्ण न झाल्यास यापुढे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा येथील नागरिकांच्या वतीने घेण्यात आला, तर यासंदर्भात हायवे अधिकारी व ठेकेदार कंपनीने कामांची पूर्तता काय केली? काम कुठपर्यंत झाले याचा आढावा घेण्यासाठी १ जुलै रोजी पुन्हा बैठक घेऊन त्याचा जाब विचारला जाणार आहे. या बैठकीला लांजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 21/Jun/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)