रत्नागिरीतील उघड्या चिरेखाणी ठरताहेत धोकादायक

Jul 3, 2024 - 13:50
Jul 3, 2024 - 13:50
 0
रत्नागिरीतील  उघड्या चिरेखाणी ठरताहेत धोकादायक

रत्नागिरी : जिल्ह्यातील उघड्या चिरेखाणी या नागरिक तसेच प्राण्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. सध्या या चिरेखाणी पावसाच्या पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. या चिरेखाणींच्या भोवती संरक्षण कुंपण नसल्याने जनावरे व नागरिकांसाठी या खाणी धोकादायक असून, संबंधित विभाग मात्र डोळेझाक करत आहे.

जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, गुहागर, राजापूर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय नागरिकांसाठीही धोक्याचा ठरत असून, तो बंद करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली; मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या पावसामुळे चिरेखाणीचे उत्खनन काम बंद आहे; मात्र चिरेखाणी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. या पाण्याचा अंदाज येत नसल्याने जनावरे व नागरिकांसाठी चिरेखाण धोकादायक ठरत आहे. अनेक बेकायदेशीर चिरेखाणी असल्या तरी काही ठिकाणी रतिसर परवानगी घेऊन चिरेखाणी आहेत; मात्र या रीतसर परवानगी घेतलेल्या चिरेखाणींनासुद्धा संरक्षण कुंपण केलेले नसल्याचे दिसून येत आहे.

चिरेखाणींना परवानगी देताना संरक्षण कुंपण असावे, अशी अट घालून महसूल विभाग परवानगी देते; मात्र ही अट निव्वळ कागदावरच राहते. जिल्ह्यात एकाही चिरेखाणीला संरक्षण कुंपण नाही. वास्तविक संबंधित विभागाने स्वतःहून यावर कारवाई करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाचे अधिकारी मात्र टेबलावर बसूनच नुसत्या खाणीच्या परवानगी फाईलवर स्वाक्षरी करत असल्याचे दिसते. डोळ्यांसमोर दिसूनसुद्धा संबंधित विभाग कारवाई का करत नाही, हा एक संशोधनाचा भाग म्हणावा लागेल.

मागील काही वर्षांत अनेक वेळा घडल्या दुर्घटना
चिरेखाणींना कुंपण नसल्याने मागील काही वर्षांत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. प्राण्यांचे जीव तर जातातच, परंतु मनुष्याचासुद्धा चिरेखाणीत पडून जीव जात असल्याचे दिसून येत आहे. काहीवेळा आत्महत्येसाठीसुद्धा याच चिरेखाणींचा वापर केला जातो. अनेक जणांना पोहण्याचा मोह आवरत नाही. काहीवेळा याच चिरेखाणीतून बुडून मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow