पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

Jul 3, 2024 - 14:46
 0
पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड लागलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्यादिशेने टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे (Pandharpur) निघाल्या आहेत.

ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. तर, एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत. याशिवाय खासगी वाहनांचीही मोठी संख्या पंढरपूरकडे ये-जा करत असते. वारीच्या (Pandharichi wari) कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो. कार, बससह विविध वाहनांतून वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागेच्या तिरी जमतात. या भाविकांसाठी राज्य सरकारने (Government) मोठा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी (Ashadhi) वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केला होता. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं, त्याचा विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी केली होती. आता, यंदाही राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

21 जुलैपर्यंत मिळणार टोलमाफी

पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना पथ करातून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी

महाराष्ट्र राज्यातून पांढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही पथकरातून सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

17 जुलै रोजी आषाढी

यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. यावर्षी प्रथमच भंडीशेगाव , वाखरी या पालखी मार्गावरील इमारती , झाडांना आकर्षक विद्युत रोषणाई करून लाखो भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोचल्यावर इसबावी , कॉलेज चौक , चंद्रभागा वाळवंट , भाविकांचे निवासस्थळ असणारे 65 एकरावरील भक्तिसागर अशा विविध ठिकाणी हे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी विविध जागांची पाहणी केली असून पालखी सोहळे येण्यापूर्वी ही विद्युत रोषणाई पूर्ण केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow