Maharashtra Weather : रत्नागिरी-सिंधुदुर्गला पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

Jul 18, 2024 - 09:45
 0
Maharashtra Weather : रत्नागिरी-सिंधुदुर्गला पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यात शेती पिकांना फटका, अद्याप पंचनामे नाहीत

अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. अकोल्यात नदी आणि नाल्यांच्या पुराचं पाणी शेतात साचलं आहे. दरम्यान, अकोट तालुक्यात मागील 9 आणि 10 जुलैला ढगफुटीसदृश्य पाऊस पडला होता. त्यामुळं येथील शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं आहे. त्या नुकसानाचे पंचनामे अजूनही झाले नाहीत. त्यात आता पुन्हा झालेल्या पावसामुळं शेत नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचलं आहे. त्यामुळं आता इथल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट उभं ठाकलं आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.

जायकवाडीसह, येलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणी साठ्यात वाढ नाही

पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळं छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत. जायकवाडीसह येलदरी, लोअर, दुधना आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे. तर उर्वरित 73 दिवसांमध्ये पाऊस चांगला पडून हे प्रकल्प भरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow