रत्नागिरी शहर बस वाहतुकीचा बोजवारा
रत्नागिरी : शहर वाहतुकीचा गेले ४-५ दिवस पुरता बोजवारा उडाला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या एसटी बसेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. एसटी बसेस नसल्यामुळे शाळेतून घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचे ७- ८ वाजत आहेत.
गेले काही दिवस शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारी शहर वाहतुकीच्या बसेस शाळांच्या ठिकाणी जात नसल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पाऊस, त्यातच शाळेत विद्यार्थ्यांसाठी घरी जाण्यासाठी बसेस उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तसेच नियमित थांब्यांवरही एसटी बसेस थांबत नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी एसटी थांब्यांवर थांबून विद्यार्थ्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करत असल्याचे चित्र शहरातील माळनाका एसटी थांब्यांवर पाहायला मिळत होते. हाती आलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटीनजीक दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या जिल्हयातील रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण व खेड या ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या, खोळंबलेल्या रेल्वे प्रवांशासाठी मुंबई जाण्यासाठी अखेरीस एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी रत्नागिरी आगारातील बसेस मुंबईत पाठवण्यात आल्याचा परिणाम येथील नियमित वाहतुकीवर झाला. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. संध्याकाळचे ७ वाजले तरी अनेक विद्यार्थी बसथांब्यांवर घरी जाण्यासाठी ताटकळत उभे असल्याचे दिसून येत होते. शहरांतील शाळांमध्ये जवळच्या गावागावांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात, मिरजोळे, काजरघाटी, कुवारबाव, कारवांचीवाडी आदी परिसरातील विद्यार्थ्यांना एसटी प्रशासनाच्या या गोंधळामुळे घरी जाण्यासाठी रात्रीचे ८ वाजल्याचे पालकांनी सांगितले.
विभाग नियंत्रक अनभिज्ञ
याबाबत अधिक माहितीसाठी मंगळवारी एसटी विभाग नियंत्रकांना संपर्क केला असता याबाबत मला कल्पना नसल्याचे सांगितले. तसेच अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी बसेस उपलब्ध असून, विद्यार्थ्यांची गैरसोय होत नसल्याचे सांगितले.
पालक-शिक्षकांचा संताप
एसटी वाहतूक विस्कळीत झाल्याचे एकंदरीत चित्र होते. मात्र, याबाबत माध्यमांकडेदेखील खरी माहिती देण्यास प्रशासनन टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत होते. एकूणच या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 18/Jul/2024
What's Your Reaction?