चिपळुणात 'अभंगवाणी' ने श्रोते मंत्रमुग्ध
चिपळूण : जय जय राम कृष्ण हरी.... इवलेसे रोप लवियेले द्वारी.... माझे माहेर पंढरी.... हरी आलारे हरी आलारे... यासारख्या एकापेक्षा एक सरस अशा अभंगांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
गायक वरद केळकर यांनी राम कृष्ण हरी अभंग सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर गायिका स्मिता करंदीकर, तन्वी मोरे, गायक अभिषेक सुतार यांनी एकाहून एक सादर केलेल्या अभंगांनी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटांनी गायकांना मोठा प्रतिसाद दिला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनाच्या सहकार सभागृहात प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, व्हाईस चेअरमन अशोक सावळे, संचालिका स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक व चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, संचालिका अॅड. नयना पवार, रुपाली कदम, शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी, पत्रकार सतीश कदम, दादा खातू, कानडे यांनी दीपप्रज्वलन केले.
यानंतर प्रास्ताविकात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी हजारो वर्षाची परंपरा असलेला आपला हा आषाढीचा उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येपर्यंत सगळ्या पालख्या आणि वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या वारकऱ्यांना यानिमित्ताने आपणही त्यांच्यासमवेत सामील होण्यासाठी अभंगवाणी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले. गायिका तन्वी मोरे यांनी, 'इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी' हा पूर्ण अभंग तर ज्येष्ठ गायिका स्वाती करंदीकर यांनी, हरी आला रे हरी आलारे संतसंगें ब्रह्मांनंदु जालारे, गायक अभिषेक सुतार यांनी, विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो... विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी।। असे अभंग सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या. गायक वरद केळकर यांनी, 'कानडा राजा पंढरीचा' हा अभंग गायला.
चिपळूणमधील नवोदित गायिका स्वरा यादव हिला अभंग गाण्याची संधी देण्यात आली. शेवटी या कार्यक्रमात विटू नामाचा गजर करीत अभंगवाणी कार्यक्रमाची सांगता झाली. या गायकांना संतोष आठवले (ऑर्गन),
निखिल रानडे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), सुहास सोहनी (तालवाद्य) यांनी साथ संगत केली तर वामन जोग यांनी निवेदन सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाचे सुत्रधार श्रीनिवास जोशी होते. यावेळी चिपळूण नागरीचे संचालक सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, राजेश बाजे, रवींद्र भोसले यांच्यासह वैभव चव्हाण, राधा शिंदे, सुप्रिया उतेकर, सुनील कानडे, भोसले, डॉ. सुनील सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत यादव मित्र मंडळाने मेहनत घेतली.
सन्मान कार्यक्रम...
प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित अभंगवाणी कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ कार्ले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच युवा वारकरी मंडळ, निरबाडे या वारकरी मंडळाला टाळ, मृदंग देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:33 PM 18/Jul/2024
What's Your Reaction?