भाजपला राज्यात जेमतेम आठ जागा मिळतील : विजय वडेट्टीवार

May 31, 2024 - 14:02
 0
भाजपला राज्यात जेमतेम आठ जागा मिळतील : विजय वडेट्टीवार

मुंबई : भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मोठे विधान केले होते.

त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे करत आरोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या होत्या. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा फटका सगळीकडेच बसतोय. कर्नाटक, महाराष्ट्रमध्ये देखील तो दिसून येतोय. त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. अशा विश्वासही विजय वडेट्टीवार (Vijay waddetiwar) यांनी बोलून दाखवला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार

देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं, हे जनतेने नजरेत ठेवलय. पंतप्रधानांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी टिप्पणी केली आहे. त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या पदावर आहोत आणि कुठल्या व्यक्तींने कुठल्या स्तरावरील राजकारण करावे, यापेक्षा दुर्दैव या देशाचे कधीच झालं नाही. दहा वर्षे साधू-संतांना विचारल्या गेले नाही, मात्र आता पंतप्रधान मोदी यांना निवडून आणण्यासाठी वाराणसीत साधूच्या बैठका घेतल्या जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार. तर बिहारमध्ये भाजपा साफ झाली आहे. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा अशी स्थितीत सरकार

सध्या विजय वडेट्टीवार मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागाची प्रचंड वाईट अवस्था आहे. कुठेही पाण्याचा पत्ता नाही. मराठवाडा विभागात आत्ता साडेसात हजार टँकर सुरू आहे.संभाजीनगर शहरात 750 टँकर सुरु आहे. शेततळे बंधारे आणि विहिरीत पाणी नाही. डाळिंब,लिंबू, संत्री अशी शेती वाळून गेली आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर झाली नाही. केवळ पंचनामा करुन पोट भरत नाही, तर पंचनामा झाल्यावर तात्काळ मदत दिल्यावर पोट भरत असते.

हे टेंडरबाज सरकार जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा, अशी स्थितीत असल्याची बोचरी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर उद्या उद्या दहा वाजता नागपूर विभागाची बैठक बोलावली असून त्यानंतर आमचा दौरा ठरविण्यात येणार असून शेतकऱ्यांना नवीन कर्ज आणि बियाण्याची सोय करून दिली पाहिजे अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांना नाराज होण्याचे काही कारण नाही

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठनेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्या तरी त्यांचं नाराज होण्याचे काही कारण नाही. पण 4 जुनचा निकाल लागल्यावर छगन भुजबळ यांची नाराजी आहे की नाही, ते स्पष्ट होईल. तसेच त्यांनीही माझी कोणतीही नाराजी नाही म्हणुन स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी जाणून बुजून केलेली चूक नव्हे तर, अनावधानाने झालेली ती चूक आहे. ते पुरोगामी विचाराचे व्यक्ती आहेत. बाबासाहेबांचे विचार घेऊन त्यांनी सातत्याने किल्ला लढवला आणि मनुस्मृति विरोधात सातत्याने त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्याचं बाऊ करून मनुस्मृति प्रकरण दाबण्याचे काम केलं जात आहे. असे माझे स्पष्ट आरोप असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow