कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पश्चिमेकडील वीजप्रकल्प बंद
चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे चिपळूण तालुक्यात पूर येत असल्याने प्रशासनाने कोयनेचे पश्चिमेकडील वीजप्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात पाच टीएमसीने अतिरिक्त वाढ झाली आहे.
धरणात ७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचे अजून तीन महिने शिल्लक असताना धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कालपासून कोयना धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसंपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५५ हजार क्युसेक झाली आहे.
कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी दोन ते अडीच हजार क्युसेक पाणी पश्चिमेकडे सोडले जाते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी कोळकेवाडी धरणात जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वाशिष्ठी नदीतून अरबी समुद्रात जाते. या पाण्यामुळे चिपळूणमध्ये पूर येत असल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या वर्षीपासून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियंत्रण केले जात आहे. अरबी समुद्रातील भरती-ओहोटी आणि चिपळूणमध्ये होणऱ्या पावसाचा अंदाज घेऊन कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. वीजनिर्मितीचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे यावर्षी धरणात पाच टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यासाठी धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पायथा वीजगृहाचे दुसरे युनिट चालू करण्याचे नियोजन आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 26/Jul/2024
What's Your Reaction?