लांजा : सापुचेतळेसह दहा गावांतील नागरिकांची वेळेत एसटी नसल्याने गैरसोय
लांजा : तालुक्यातील सापुचेतळे येथील शालेय विद्यार्थी आणि दहा गावांतील प्रवाशांच्या वेळेत एसटी नसल्याने गैरसोय होत आहे, त्यांच्या सोयीसाठी सापुचेतळे येथे कायमस्वरूपी दोन एसटी बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी लोकमान्य शिक्षणसंस्था सापुचेतळेचे अध्यक्ष विश्वनाथ ऊर्फ अनिल गुरव यांनी केली आहे. याचे निवेदन काल लांजा एसटी आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील सापुचेतळे हे दिवसेंदिवस विकसित होत आहे. या ठिकाणी असणारा चिरेखाण व्यवसाय व अन्य व्यवसायामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी बाजारपेठ आहे. साधुचेतळे येथे असणाऱ्या शाळा, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आगवे, कोट आगरगाव, उपळे, खानवली, चांदोर, हरचिरी, अहिल्यानगर, विरगाव, वाडीलिंबू, वाझट गावांतून आठवी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांच्या वेळेत एसटी नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्याचप्रमाणे सापुचेतळे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी या परिसरातील दहा गावांतील लोक प्राथमिक आरोग्यकेंद्र, बँक, बाजार व अन्य कामांसाठी या ठिकाणी येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. या सर्व गोष्टी लक्षात घेता, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आगारातून दोन एमटी बस सापुचेतळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून ग्रामस्थ, विद्याथ्यांची गैरसोय दूर होईल आणि लांजा आगाराला चांगले भारमान मिळू शकेल या दृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी लोकमान्य शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अनिल गुरव यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 10/Aug/2024
What's Your Reaction?