महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बाकी असलेल्या सर्व कर्जदारांनी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि त्यासाठी विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटीतर्फे १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना महा-आयटीमार्फत एसएमएस पाठविण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी २८ हजार ८७६ कर्जदार शेतकऱ्यांची खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी १७ हजार ९४९ कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १६ हजार ९३९ आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून अजून १००८ कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १६ हजार २६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३२ कोटी ४२ लाखाची रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 16-08-2024
What's Your Reaction?