रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना ३४ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर
रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ८४६ ग्रामपंचायतींसाठी ३४ कोटी ६६ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत. ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात लवकरच ही रक्कम वर्ग होणार असून, आराखड्यानुसार कामेही मार्गी लागणार असल्याने गावच्या विकासाला चालना मिळणार आहे.
केंद्र शासनाकडून बंधित आणि अबंधित स्वरूपाचा निधी मंजूर केला जातो. या निधीपैकी ८० टक्के निधी थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येतो. गावविकास आराखड्यात समावेश असलेल्या कामावर हा निधी खर्च करावा लागतो. शिवाय आवश्यकतेनुसार ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या मान्यतेने कामे घेता येतात. ज्या ठिकाणी प्रशासक आहे अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जात नाही. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने गावामधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा विकास झाला आहे. ग्रामपंचायतींना मंजूर निधी पंधराव्या वित्त आयोगातील सर्वाधिक ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी देण्यात येतो. या निधीतून ग्रामपंचायतींनी निधीचा वापर करून गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी; मात्र, कर्मचारी वेतन किंवा आस्थापनाविषयक बाबींवर हा निधी खर्च करता येणार नाही. असे आदेशात स्पष्टपणे शासनाने नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 24/Aug/2024
What's Your Reaction?