शरद पवार भाजपच्या सत्तेचा घास हिरावणार..?

Jun 4, 2024 - 15:31
 0
शरद पवार भाजपच्या सत्तेचा घास हिरावणार..?

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले असून भाजपप्रणित NDA आघाडीला काठावर बहुमत मिळताना दिसत आहे. लोकसभेच्या एकूण 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 298 जागांवर एनडीए (NDA Alliance) आघाडीवर आहे.

तर 227 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे. त्यामुळे हे कल कायम राहिल्यास भाजपप्रणित एनडीए आघाडी सहजपणे सरकार स्थापन करु शकते. मात्र, याचवेळी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) गोटातील नेत्यांनी पडद्यामागून हालचाली सुरु केली आहे. इंडिया आघाडीचे नेते हे अत्यंत धाडसी राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या सगळ्या रणनीतीची सूत्रे शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून हलवली जात असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर इंडिया आघाडीकडून तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. यापैकी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने नितीश कुमारांना उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. नितीश कुमार आणि तेलुगू देसम पक्षाशी शरद पवार यांनी फोनवरुन संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, शरद पवार गटाकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. मात्र, 2019 नंतरच्या महाराष्ट्रातील राजकारणाचा एकूण पॅटर्न पाहता कोणतीही शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

मोदींना उल्लेख केलेली 'भटकती आत्मा' भाजपचं राजकारण बिघडवणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पुण्यातील प्रचारसभेत शरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. ही 'भटकती आत्मा' पंतप्रधानपदाचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण बिघडवत आहे, अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. मात्र, आता लोकसभा निवडणुकीनंतर हीच 'भटकती आत्मा' एनडीएतील घटकपक्षांना हाती धरुन भाजपचे राजकारण बिघडवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुपारी तीन वाजेपर्यंतच्या इंडिया आघाडीच्या जागांचा आकडा 227 इतका आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या 97 जागांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीची साथ न घेता निवडणूक लढवली होती. तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलुगू देसमच्या संभाव्य 16 आणि नितीश कुमार यांच्या पक्षाच्या 14 जागांची बेरीज केल्यास इंडिया आघाडी बहुमताचा 272 आकडा पार करु शकते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow