राजापूर : शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती
राजापूर : राजापूर तालुक्यातील शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी दिली. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेठ्याही उपलब्ध असून, सहा माध्यमिक शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे.
बदलापूर येथे शाळेमध्ये घडलेल्या लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. याप्रकरणी शासनाकडून सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केली आहे का? याची शहानिशा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. राजापूर तालुक्यात ३२६ प्राथमिक व ५२ माध्यमिक शाळांपैकी सर्व शाळांत सखी सावित्री समिती गठित करण्यात आली आहे. यासोबत विद्याथ्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रारपेठ्याही ठेवण्यात आल्या आहेत. नॅशनल इंलिश स्कूल, नवजीवन हायस्कूल, नान विद्यामंदिर ओणी, शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल ओणी, सरस्वती विद्यामंदिर पाचल, निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडचे अशा सहा माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत; मात्र, प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही सेवा उपलब्ध नाहीत. दरम्यान, शाळाभेटीच्या माध्यमातून शाळेतील शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधून मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणती काळजी घ्यावी, याबाबत सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
सखी सावित्री समिती
सावित्रीबाई फुले यांच्या १२५व्या स्मृतिदिनानिमित्ताने विविध स्तरांवर महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे सखी सावित्री समितीचे परिपत्रक २०२२ मध्ये काढण्यात आले होते. त्यानुसार मुला-मुलींच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही समिती कामकाज पाहणार आहे. शाळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील, शाळेतील महिला शिक्षक, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील महिला प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य अथवा नगरसेवक, पालक प्रतिनिधी, शाळेतील दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 30/Aug/2024
What's Your Reaction?