गणपती बाप्पाच्या उत्सवात किनारी भागात पाऊस ओसरण्याची शक्यता..
रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांच्या पावसाच्या सातत्यानंतर बुधवारपासून पावसाचा जोर ओसरलेला राहण्याची शक्यता आहे. दि. १० सप्टेंबरपर्यंत पाऊस ओसरणार असून, बाप्पाच्या उत्सवात पाऊस उघडीप घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत हवेचा दाब कमी राहणार असल्याने किनारी भागात पाऊस ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 'ग्रीन अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासांत ३१.६६ मि.मी.च्या सरासरीने २८५ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये लांजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७० मि. मी. पावसाची नोंद झाली.
काही भागांत पावसाच्या हलक्या सरी तर काही भागांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. दि. ७ सप्टेंबरपासून गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याने ही बाब गणेशभक्तांसाठी सुखकारक आहे तर या कालावधीत काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून, उन्हाचा तापही कमी होण्याची शक्यता असल्याने खरीप लागवड क्षेत्रात भाताच्या वाढीसाठी हे वातावरण अनुकूल ठरणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना १ ते ४ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला होता. मात्र, बुधवार ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत पाऊस उघडीप घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी त्यानंतर पावसाने उसंत घेतली. यामध्ये सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात झाला. मंडणगड तालुक्यात ३२ मि.मी., दापोली १५, खेड १७.५७, गुहागर ४७, चिपळूण ९.४४, संगमेश्वर १९.१६, रत्नागिरी ३२, लांजा ७० आणि राजापूर तालुक्यात ४२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३७०० मि.मी. च्या सरासरीने ३३२७९ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाने सरासरीही गाठली नव्हती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने हजार मि.मी. ची सरशी साधली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 04/Sep/2024
What's Your Reaction?