अळंबीसाठी गावागावात खवय्यांची भटकंती
गुहागर : आषाढाचा धो-धो कोसळणाऱ्या पावसाने धरती ओलीचिंब झाली असून, माळरानावर उगवणाऱ्या अळंबीच्या शोधात गावकऱ्यांची पावले वळलेली दिसून येत आहेत. भल्या पहाटे उठून रानात शुभ्र पांढरी उगवणारी अळंबी मिळविण्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये सध्या खवय्यांची भटकती सुरू झाली आहे. आषाढचा पाऊस हा वेगळाच असतो. जुन्या जाणत्या लोकांना तो लगेच समजतो. विशेष करून रानात नियमित गुरे चरावयास नेणारे गुराखी यांचे लक्ष अळंबीकडे अधिक असते. आषाढचा पाऊस हा अंगाला टोचणारा आणि एखादी अचानक मोठी सर ताडताड करत येते. अनुभवी लोकांना हा पाऊस लगेच समजतो. याच कालावधीत मिळणारी अळंबी ही प्रामुख्याने लाल मातीचा भाग, जिथे निर्जन ठिकाण असते तेथे उगवते. साधारणतः आषाढाच्या पंधरवड्यात अळंबी उगविण्याचा काळ असतो. अळंबी ही पहाटे उगवते. सफेद शुभ्र कळीदार अळंबी सकाळी फुलली की ती छत्रीसारखी दिसते. रानोमाळ हिरव्यागार गवतात तिचे पांढरेपण लगेच उठून दिसते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 17/Jul/2024
What's Your Reaction?