बाप्पाच्या प्रसादासह फळांचे दरही वधारले..
राजापूर : अवघ्या दोन दिवसांचा गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचे भावही वाढले आहेत. बाप्पाच्या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या फळांच्या दरांमध्येही गतवर्षी तुलनेमध्ये सरासरी १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून सर्वच वस्तूंचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, विविध भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचा समावेश आहे. या वाढत जाणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. या वाढत्या महागाईमध्ये सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे' आगमन होत आहे. बाप्पासाठी आरासासाठी वापरण्यात येणाऱ्या मखरांसह अन्य
विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेमेध्ये दाखल झाले आहे. याव्यतिरिक्त रोषणाईसाठी वापरण्यात येत असलेली विविध प्रकारची लायटिंग आणि अन्य साहित्यही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. श्रीच्या प्रसादासाठी वापरण्यात येत असलेल्या विविधा फळांच्या दरामध्येही गतवर्षीच्या तुलनेमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गणपतीच्या प्रसादासाठी सफरचंद, मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब, पिकू, नासपती आदी विविध प्रकारची फळे वापरली जातात. त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये विविध प्रकारच्या फळांना मोठ्या प्रमाणात असलेल्या मागणीतून या काळात लाखो रुपयांची बाजारपेठेत उलाढाल होते. सद्यःस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या दुकानांसह फळविक्रेत्यांनीही मोठ्या संख्येने दुकाने थाटली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फळांच्या दरामध्ये फारशी वाढ न होता सरासरी दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. असे असते तरी गणेशभक्तांकडून फळांची चांगली मागणी आणि खरेदीही होत आहे. त्यातून चांगली उलाढाल होत आहे - गणेश पाटील, फळविक्रेता
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 06/Sep/2024
What's Your Reaction?