मुंबई, पुणे, कोल्हापूरसह जिल्ह्यांतर्गत प्रवास महागला; प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर
रत्नागिरीत एसटी भाडेवाढ लागू झाल्याने नियमित प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नियमित तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही नवी दरवाढ १८ जुलैपासून अधिकृतपणे लागू झाली असून शनिवारपासून प्रवाशांकडून नवीन दरानुसार तिकीट आकारणी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी विभागातील प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लांब पल्ल्याच्या आणि जिल्ह्यांतर्गत मार्गांवरील प्रवास महागला
या नवीन तिकीट दरवाढीमुळे रत्नागिरीहून मुंबई, बोरीवली, पुणे, कोल्हापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जादा तिकीट दर मोजावे लागत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या राजापूर, चिपळूण, लांजा यांसारख्या प्रमुख मार्गांवरही तिकीट दरात वाढ झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीटाच्या दरात १९ ते २२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर जिल्ह्यांतर्गत स्थानिक मार्गांवर ३ रुपयांपासून ते १४ रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
महामंडळाने स्पष्ट केली भाडेवाढीची कारणे; १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द
वाढत्या तिकीटदराबाबत एसटी महामंडळाकडून अधिकृत कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनवाढ आणि विविध भत्त्यांमधील वाढ, वाहनांच्या सुट्या भागांचे (Spares) वाढलेले दर, टायर खरेदी तसेच बसच्या एकूणच देखभाल-दुरुस्तीचा खर्च कमालीचा वाढल्यामुळे ही दरवाढ करणे भाग पडल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, प्रवाशांना काहीसा दिलासा देण्यासाठी महामंडळाने यापूर्वी लागू केलेली १० टक्के ‘हंगामी भाडेवाढ’ पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 21-07-2026














