Ratnagiri Heavy Rainfall Update: रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत २५१ मि.मी. पाऊस; खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्वरमध्ये जोर कायम

खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीवर; जिल्ह्यात आतापर्यंत ५७.४२ टक्के पावसाची नोंद

रत्नागिरी / प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा एकूण जोर काहीसा ओसरला असला, तरी खेड, चिपळूण, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी कायम आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल २५१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून Ratnagiri Heavy Rainfall Update नुसार खेड तालुक्यातील जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीवरून वाहत आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी शहर व तालुक्यात पावसाचा प्रभाव सर्वात कमी दिसून येत असून दिवसभरात ऊन-पावसाचा खेळ खंडोबा सुरू आहे.

जुलैच्या पावसाने भरून काढला जूनचा बॅकलॉग

यंदा जून महिन्यात जिल्ह्यात पावसाची सुरुवात अत्यंत मंद झाली होती. जूनच्या सुरुवातीला अवघे ५ ते ६ दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिना उजाडताच पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या एका आठवड्यात जून महिन्याची तूट भरून काढत जुलैअखेर यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे.

आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १ हजार ९३१ मि.मी. म्हणजेच ५७.४२ टक्के इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी याच दोन महिन्यांच्या कालावधीत ५१ टक्के पावसाची नोंद झाली होती.

भात-नाचणी लावणी अंतिम टप्प्यात; टँकरचा पाणीपुरवठा बंद

जुलै आणि ऑगस्टच्या या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले आणि धरणे तुडुंब भरली असून पिण्याच्या पाण्याचे संकट पूर्णपणे टळले आहे. जिल्ह्याला लागणारा टँकरद्वारे पाणीपुरवठा मागील महिन्यातच पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतात भात आणि नाचणीच्या लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. सध्या ऑगस्ट महिन्यात दिवसा ऊन आणि उकाड्याचा त्रास जाणवत असला, तरी सायंकाळच्या सुमारास मुसळधार सरी कोसळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 05-08-2026