मासेमारी हंगामाच्या प्रारंभी कोळी बांधवांनी सुखरूप प्रवासासाठी आणि भरघोस मासळीसाठी समुद्रराजाला घातले गाऱ्हाणे
दापोली : निळ्याशार अथांग समुद्राला साक्षी ठेवत हातात नारळ घेऊन कोळी बांधवांनी सागराला घातलेले गाऱ्हाणे, ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक, रंगीबेरंगी सजवलेल्या मासेमारीच्या होड्या आणि पारंपरिक पेहरावातील कोळी बांधव अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात दापोली तालुक्यातील हर्णै, पाजपंढरी, दाभोळ यांसह विविध बंदर परिसरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजासाठी केवळ सण नसून समुद्राशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी समुद्रराजाची विधिवत पूजा करून सुखरूप प्रवास, सुरक्षित परतावा आणि भरघोस मासळीचे साकडे घातले जाते. यानिमित्त सोन्याच्या रंगाचा नारळ आकर्षक पद्धतीने सजवून समुद्राला अर्पण करण्यात आला. ‘आमच्या नाखवा दादा आणि कोळी बांधवांचे संकटांपासून रक्षण कर, समुद्र शांत ठेव आणि आमच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे,’ अशा भावनिक शब्दांत समुद्रराजाला गाऱ्हाणे घालण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:48 28-08-2026














