रत्नागिरी: शहरातील खवय्यांसाठी आता एक नवीन आणि चविष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. रत्नागिरी गाडीतळ येथील फाटक हायस्कूल समोर ‘हॉटेल सद्गुरू किचन’ या नूतन हॉटेलचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांच्या शुभहस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. घरगुती पद्धतीचे शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्यहारी जेवणाची चव आता रत्नागिरीकरांना एकाच ठिकाणी चाखता येणार आहे.
यावेळी हॉटेलच्या प्रोप्रायटर अनुजा रेडीज आणि अंजली कदम यांनी आपल्या नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, “रत्नागिरीतील खवय्यांना उत्तम दर्जाचे आणि चविष्ट जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘सद्गुरू किचन’ सुरू केले आहे. आमच्याकडे अस्सल घरगुती पद्धतीने बनवलेले शाकाहारी, मांसाहारी आणि विशेषकरून कोकणी पद्धतीचे मत्स्यहारी पदार्थ उपलब्ध असतील. यासोबतच, ग्राहकांसाठी रोज नवनवीन नाश्त्याचे पदार्थही ठेवण्यात येणार आहेत.”
नोकरदार वर्गाची सोय लक्षात घेऊन हॉटेलतर्फे विशेष टिफिन सुविधा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे रेडीज आणि कदम यांनी यावेळी सांगितले. यामुळे कामाच्या गडबडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरच्या जेवणाचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांनी अनुजा रेडीज आणि अंजली कदम यांना त्यांच्या या नवीन व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी या महिला उद्योजकांच्या धैर्याचे कौतुक करत त्यांच्या हॉटेलला यश चिंतितो, अशा भावना व्यक्त केल्या.
या उद्घाटन सोहळ्याला श्री. दादा दळी यांच्यासोबत स्वरूप गांगण, प्रसाद बेर्डे, ऋग्वेद दळी, दर्शन दळी, पूजा गांगण, रिया शेरे, कानावजे आणि अनिश रेडीज यांच्यासह अनेक मान्यवर आणि खवय्ये उपस्थित होते. या नवीन हॉटेलमुळे गाडीतळ परिसरातील खाद्याप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 05/Sep/2025












