चिपळूण : शिरगांव अलोरे पुलावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी
चिपळूण : तालुक्यातील शिरगांव येथे शिरगांव अलोरे पुलाचे काम चालू आहे. शिरगांवच्या बाजूला पुलाजवळ उजव्या बाजूस संरक्षण भिंत घातलेली नाही. त्या बाजूने नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाहतो. तिथे संरक्षण भिंत नसल्याने त्या बाजूकडील घरांना मोठा धोका आहे. येथे पाण्याचा मारा होऊन तेथील भराव व माती मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे.
तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदीचे पाणी आसपासच्या घरांमध्ये घुसते. त्यामुळे तेथे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी शिरगांव येथील सूरजराव शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिरगाव येधील या पुलाच्या डाव्या बाजूची जुनी संरक्षण भिंत उभी असली तरी तो ढासळलेली आहे. त्यामुळे या भिंतीची डागडुजी करणे गरजेचे आहे. अन्यथा, ती कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी शिरगावच्या बाजूस उजव्या व डाव्या बाजूला संरक्षण भिंत त्वरित उभारण्यात यावी, शिरगांव अलोरे पुलावरून एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या व अवजड वाहने जातात. या रस्त्यावरून शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन सध्या या पुलावरून चालावे लागत आहे. हा पूल बांधताना उजव्या बाजूस नदीपात्रात समाधी मंदिर येथे पुलावर भलीमोठी मोकळी जागा सोडण्यात आली. हे खूप धोकादायक आहे. त्यामुळे पूल तांत्रिकदृष्टया अपूर्ण, चुकीच्या पद्धतीने बांधला गेला असल्याचे येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले. दरवर्षी समाधी मंदिरवरून पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास वाशिष्ठी नदीचे पाणी वाहते. त्याच ठिकाणी पुलावर मोकळी जागा ठेवली आहे. त्याचा धोका पुलाजवळील शिरगाव येथील शेतकऱ्यांना आणि घरांना होणार आहे. दरवर्षी तेथे पावसाळ्यात पाणी साचते आणि ते नागरिकांच्या घरात आणि शेतात घुसते, त्यामुळे त्यांना खूप मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याचाही संबंधित प्रशासनाने विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकातून होत आहे.
पादचाऱ्यांना दुतर्फा जागा द्या...
शिरगाव चौक ते शिरगाव-अलारे पूल येथपर्यंत नागरिकांच्या हितासाठी रस्त्याच्या दुतर्फा चालण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, याची खबरदारी घेण्यात यावी. या तक्रारीला शिरगाव ग्रामस्थांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 26/Jun/2024
What's Your Reaction?