रत्नागिरी : काळबादेवी, जयगड पुलाला हिरवा कंदिल; सागरी महामार्गाच्या कामाला मिळणार गती

Jun 28, 2024 - 15:02
 0
रत्नागिरी : काळबादेवी, जयगड पुलाला हिरवा कंदिल; सागरी महामार्गाच्या कामाला मिळणार गती

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस रेडी या सागरी महामार्गावर रत्नागिरीतील काळबादेवी आणि जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पुलाला हिरवा कंदिल मिळाल्यामुळे सागरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. रत्नागिरीतील या दोन पुलांबरोबरच सिंधुदुर्ग आणि रायगडमधील एका पुलाचा समावेश आहे.

कोकण किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेडी या सागरी महामार्गावर पूल उभारण्यासाठी एकूण चार पुलांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या, काळबादेवी पूल रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी खाडीवर काळबादेवी बीच आणि सडयामिऱ्याला जोडणार आहे. या पुलाच्या कामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. काळबादेवीसाठी २९१.६४ कोटींचा खर्च अपेक्षित असून, हा पूल २ लेनचा असून सुमारे १.८ किमी लांबीचा आहे. कुणकेश्वर येथील पुलासाठी १५८.६९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

या दोन पुलांबरोबर आणखी दोन अशा एकूण चार पुलांसाठी चार कंपन्यांनी ९ निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पूल ३.८ किमी लांबीचा आहे. रायगडमधील कुंडलिका खाडीवर रेवदंडा ते साळव खाड़ी पूल ४.४ किमी लांबीचा उभारण्यात येणार आहेत. आता निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पुलांच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला जाणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.

रायगडला सुरुवात, सिंधुदुर्गात शेवट
सागरी महामार्गासाठी ९ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरूंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातून रेवस येथून सागरी मार्गाची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेडी येथे शेवट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow