अंशकालीन महिला परिचर संघटनेचा संप अखेर मागे
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील १९६६ पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत संप पुकारला होता. शासनाच्या ठोस आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३५० अंशकालीन महिला गुरुवारपासून पुन्हा कार्यरत झाल्या आहेत.
गेली अनेक वर्ष या महिला विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करत आहेत. जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एकत्रित येत आक्रोश आंदोलन केले होते. यावेळी शासनाने या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नाही. यामुळे या महिला परिचरांनी पुन्हा शासनाविरोधात एल्गार पुकारला होता.
किमान वेतन २१ हजार रुपये देण्यात यावे. अंशकालीन नावात बदल करण्यात यावा, प्रसुती रजा मंजूर करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात १ पद ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर देण्यात यावे. या प्रमुख मागण्या अंशकालीन महिला परिचरांच्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रा. आ. केंद्र व उपकेंद्रातील अंशकालीन महिला परिचर आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राज्यातील तब्बल १० हजार ६७३ महिला परिचर मुंबईतील आझाद मैदानावर एकवटल्या होत्या. शासनाने या सर्व मागण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे हा संप मागे घेण्यात आला.
"गेली काही वर्ष मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आलो आहे. प्रत्येकवेळी दुर्लक्ष केले गेले आहे. मात्र, शासनाने सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला." - आकांक्षा कांबळे, जिल्हाध्यक्षा, महिला अंशकालीन परिचर संघटना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 12-07-2024
What's Your Reaction?