रत्नागिरी रेल्वेस्थानकावर वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांसाठी कक्ष
रत्नागिरी : दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक रविवारी सायंकाळपासून सोमवारी सायंकाळपर्यंत बंद राहिल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या रुग्णांकरिता रत्नागिरी रेल्वेस्थानकावर वैद्यकीय कक्ष सुरू करून गरजूंना वैद्यकीय सेवा देण्यात आली.
खेडजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक दोन दिवस विस्कळीत झाली होती. रत्नागिरी येथील रेल्वेस्थानकावरदेखील रविवारी सायंकाळपासून दोन एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवासी ताटकळत राहिले होते. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी स्थानकावर जाऊन रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली. प्रसंगावधान दाखवून केलेल्या या मदतीसाठी प्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत रेल्वे प्रवासात वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांची तसेच गाड्यांमधील खोळंबा झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी रेल्वेकडून खबरदारी घेतली. सोमवारी सकाळपासून रत्नागिरी येथील रेल्वेस्थानकावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 18/Jul/2024
What's Your Reaction?