संगमेश्वर स्थानकात 9 गाडयांना थांबा मिळावा; कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद नसल्याने येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार
नवी मुंबई : संगमेश्वर स्थानकात लांब पल्ल्याच्या 9 गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी गेले अनेक महिने होत आहे. यां मागणीचे पत्र कोकण रेल्वे प्रशासनाला देऊनही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने येत्या स्वातंत्र्य दिनी संगमेश्वर स्थानकात लक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार श्री संदेश जिमन यांनी दिली आहे.
संगमेश्वर हा तालुका भौगोलिक दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून सुमारे 196 गावे असलेल्या यां तालुक्यातील जनतेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गांवरील महत्त्वाचे स्थानक आहे.
ह्या वर्षाला सर्वाधिक सुमारे 5 कोटी 37 लाख हुन उत्पन्न देणाऱ्या यां स्थानकात दररोज सुमारे 1600 प्रवासी ये जा करतात. यां प्रवाशांना खरं तर सद्य स्थितीत असणाऱ्या गाड्या खूपच कमी पडत आहेत याचाच विचार करून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर यां फेसबुक ग्रुप ने संघर्ष करून गतवर्षी नेत्रावती एक्सप्रेस ला थांबा मिळवला.
गुजरात, दिल्ली तामिळनाडू कडे जाणाऱ्या गाड्यापैकी एक तरी गाडी यां स्थानकात थांबणे अपेक्षित आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न देत असतानाही कोकण रेल्वे प्रशासन इथल्या प्रवाशांच्या मागण्याना योग्य प्रतिसाद देत नाहीत. या सांबधी 9 गाडयांना थांबा मिळावा अशा आशयचे मागणी पत्र रेल्वे प्रशासनाला देऊनहि त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.
या संबंधिचे पत्र रेल्वे प्रशासनाला त्वरित देण्यात येणार असून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिमन यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 20-07-2024
What's Your Reaction?