Ratnagiri : जिल्ह्यातील ३ हजार शाळांमध्ये 'महावाचन' उत्सवाचे आयोजन

Jul 25, 2024 - 17:20
Jul 25, 2024 - 17:26
 0
Ratnagiri : जिल्ह्यातील ३ हजार शाळांमध्ये 'महावाचन' उत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : वाचन हे व्यक्तिमतत्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे गतवर्षी रोड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राज्यात वाचन चळवळ उपक्रम राबवण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३ हजार सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ३० ऑगस्टपर्यंत या महावाचन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. त्या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जाणार आहे, शालेय शिक्षण विभाग रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवणार आहे.

या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड करण्यास राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. या उपक्रमासाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून वेबपोर्टल तयार केले जाणार आहे.

या उपक्रमामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र इत्यादी साहित्याची निवड करतील आणि त्याचे वाचन करतील, सहभागी सर्व विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावरील त्यांचे विचार लिखित आणि चित्रफितीच्या स्वरुपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दमर्यादा असेल, वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एक मिनिटाचा व्हिडीओ-ऑडिओ क्लिप या पोर्टलवर विद्यार्थ्यांना अपलोड करावी लागेल.

वाचन उपक्रमाची वैशिष्ट्ये...
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी नाळ जोडणे, दर्जेदार साहित्य लेखक व कवीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, विद्यार्थ्यांमध्ये भाषा संवाद कौशल्य विकसित करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:31 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow