दापोलीत तीन दिवस बत्तीगुल; वारंवार तांत्रिक बिघाड
दापोली : दापोली तालुक्यात सतत होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे शहर आणि ग्रामीण भाग तीन दिवसांपासून अंधारात राहिले. या बाबत महावितरणचे अधिकारी समर्पक उत्तर देत नसल्याने जालगाव ग्रामस्थांनी वितरण अधिकारी यांचे कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेत धारेवर धरले. मागील काही दिवसांपासून मुख्य विद्युत प्रवाहाच्या ३३ केव्ही आणि २२ केव्हीच्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड होत आहे. विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. घरातील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्याही निकामी झाल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक चांगलेच संतापले आहेत.
मुबलक पाणी असूनही वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी मिळत नाही, त्यामुळे नागरिकांना नदी, विहीरिवरून पाणी आणावे लागत आहे तर शहरात पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. घरातील विद्युत उपकरणे बंद आहेत. अन्नाची नासाडी होत आहे. मोबाईल चार्ज करता येत नाहीत. खंडित वीजपुरवठयाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. अनेक दुकान व्यावसाईकांची लाखोंची नासाडी झाली आहे. या बाबत दि. २६ रोजी जालगाव ग्रामस्थ आक्रमक दिसले. या वेळी खेड येथील अधिकारी बावरेकर यांनी दापोलीत भेट देऊन दापोलीतील संतप्त नागरिकांशी शांतपणे चर्चा केली त्यानंतर नागरिक शांत झाले.
अनेक वेळा दापोलीतील महावितरण अधिकारी यांना फोन केला की, एक तासात, दोन तासात लाईट येईल, असे सांगितले जाते. कधी कधी अधिकारी फोन उचलत नाहीत. तीन दिवस झाले तरी विजेचा पत्ता नाही. -रोशन मंडपे, ग्राम पंचायत सदस्य गिम्हवणे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 29/Jul/2024
What's Your Reaction?