सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत पालकमंत्री घेणार जनता दरबार
◼️ नागरिकांच्या शासन दरबारी प्रलंबित विषयांना मिळणार गती : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
◼️ १२/१३/१४ ऑगस्टचे नियोजन
सिंधुदुर्ग : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात आणि मुंबई येथील कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांकडून अनेक निवेदने देण्यात येतात. ज्यात नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील छोट्या छोट्या समस्यांचा समावेश असतो. पालकमंत्री कार्यालयाकडून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जातो मात्र शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे असे प्रश्न तडीस जात नाही, विशेषतः नागरिकांच्या महसुली, आरोग्य अश्या कामांमध्ये यंत्रणेचे वेळकाढू धोरण आडवे येते. यावर्षात आचारसंहितेची, स्टाफ कमी असल्याची कारणे देत नागरिकांना अनेक साध्या साध्या प्रश्नांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेन्द्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार हे सामान्य लोकांना दिलासा देणारे, त्यांच्या सुसह्य जगण्याप्रती कटिबद्ध सरकार आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केलेले आहे. त्याला सुशासनाची जोड गरजेची आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या महसुली, आरोग्यविषयक आणि अनेक प्रलंबित समस्यांना गती देण्याच्या अनुषंगाने मा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिनांक १२/१३/१४ ऑगस्ट या तीन तारखांना अनुक्रमे कणकवली, कुडाळ मालवण आणि सावंतवाडी या तीन मतदरसंघातील नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. यावेळी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांची परिपूर्ती करणार आहेत.
तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, की दिनांक ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आपापल्या प्रलंबित समस्यांचे एक तपशीलवार निवेदन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी, आमदार नितेश राणे यांचे कार्यालय कणकवली, श्री नीलेश राणे यांचे कार्यालय मालवण/कुडाळ आणि श्री राजन तेली यांचे कार्यालय सावंतवाडी तसेच सर्व तालुका भाजपा कार्यालये या ठिकाणी दोन प्रतीत आणून द्यावीत. संबंधित तारखांना आपल्याला उपस्थित राहण्यासाठी स्थळ आणि वेळ कळविली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 29-07-2024
What's Your Reaction?