कशेडी घाटात खचला रस्ता
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावाजवळ रस्ता खचला आहे. त्या भागात खडी पसरून पुन्हा मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील तळकोकणात जाणारी व मुंबई दिशेने जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
खेडच्या दिशेने जाणारा ट्रक खचलेल्या रस्त्यापासून पुढे पाच मीटर अंतरावर बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. शासन दरवर्षी या खचलेल्या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करत असून तो पैसा फुकट जात आहे. या ठिकाणी खचलेल्या रस्त्याला लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. २००५ पासून येथील रस्त्याला ग्रहण लागले असून, दरवर्षी सातत्याने या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे. दरवर्षी शासनाकडून या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो, मात्र पावसाळ्यात मुख्यतः जुलै महिन्यात रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे. संबंधित खात्याकडून कायमस्वरूपी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे वाहनचालक व प्रवासी जनतेला याची झळ बसत आहे. धामणदेवी, दत्तवाडी येथे बोगद्यातून जाणाऱ्या नवीन मार्गाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी महामार्गावर अक्षरशः गटाराचे स्वरूप आले आहे. त्या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत: नाही. या परिसरात अवजड वाहने चढत असताना अक्षरशः चढावरून पाठीमागे घसरून मोठा अपघातही घडू शकतो, अशी शक्यता आहे. याच ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असून त्याकडे डोळेझाक केली जात असल्याचे प्रवासी जनतेतून बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 31/Jul/2024
What's Your Reaction?