मंडणगड-मुंबई एसटी बसचा मार्ग बदलल्याने प्रवाशांची गैरसोय
मंडणगड : मंडणगड आगारातून मुंबई मार्गावर सुरू असलेल्या एसटी बसेसचा मार्ग बदल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. मंडणगड आगारातून संध्याकाळी ५ वाजता सुटणारी मंडणगड-मुंबई व येताना संध्याकाळी ४ वाजताची मुंबई-मंडणगड ही गाडी महाडमार्गे वळवण्यात आली आहे. ही गाडी पूर्वी आंबेतमार्गे सुरू होती. ती पूर्ववत आंबेतमार्गे झाली तर प्रवाशांसाठी सोयीची असून, वेळ व पैशांची बचत होईल.
मंडणगड आगारातून सायंकाळी पाच वाजता सुटणारी मंडणगड-मुंबई ही गाडी लाटवण-महाड यामार्गे मुंबईकडे रवाना होते. ही बस मुंबई येथे रात्री साडेबारा ते एक वाजणयाच्चा सुमारास पोहोचते. ज्यामुळे त्या दरम्यान रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांना टॅक्सी किंवा रिक्षा करून घरी जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड चाकरमान्यांना सहन करावा लागतो. तसेच घरी पोहोचण्यासाठी वेळही अधिक लागतो. महाडमार्गे असल्यामुळे तिकीटही महाग आहे. प्रवाशांना बसणारा भुर्दंड लक्षात घेऊन ही गाडी आंबेत, गोरेगावमार्गे वळवण्यात आली तर रात्री ११ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचेल.
विरार, नालासोपारा, बोरिवली या भागांत जाणारे प्रवासी या गाडीने प्रवास करण्यास सुरुवात करतील तसेच वेळ आणि पैशांची बचत होईल. याकडे एसटी प्रशासनाने गांभीयनि पाहावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
गणेशोत्सवापूर्वी मार्ग बदला
मंडणगडमध्ये येणारे मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी मंडणगड-मुंबई या गाडीचा ये-जा करण्यासाठी अधिक वापर करतात. वेळेबरोबरच पैसे अधिक जात असल्यामुळे एसटीचा प्रवासी अन्य मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मार्ग बदलाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:05 PM 03/Aug/2024
What's Your Reaction?