लांजा आगारातून गणेशोत्सव काळात एसटी फेऱ्यांचे नियोजन करा : श्रीकृष्ण हेगिष्टे
लांजा : गणेशोत्सव काळात लांजा तालुक्यातील रेल्वेस्टेशनवर चाकरमान्यांसाठी रेल्वेगाड्या येण्याच्या वेळी लांजा आगारातून एसटी फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी लांजा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी प्रवासी राजा दिन या एसटी महामंडळ उपक्रमांतर्गत कार्यक्रमात केली आहे.
लांजा येथे प्रवासी राजा या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद लाभला. लांजा आगारातील विविध समस्यांबाबत विभागीय नियंत्रक यांनी लांजा येथे बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या सेवांबाबत प्रवासांच्या असणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक एसटी आगारात प्रवासी राजा दिन हा कार्यक्रम आयोजित केला होता. शुक्रवारी लांजा आगारात हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रवास संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, दत्ता कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप, सुधाकर कांबळे, आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, एसटी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. गणपती उत्सवकाळात मुंबईतून रेल्वेमधून येणारे प्रवासी रेल्वेस्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना घरी पोहोचण्यासाठी खासगी वाहनाने जाण्यास दुप्पट भाडे द्यावे लागते. चाकरमान्यांचा होणारा मनस्ताप टाळण्यासाठी आडवली, विलवडे या रेल्वेस्टेशनवर नियोजित रेल्वेफेऱ्यांच्या वेळी एसटी उपलब्ध करण्याची मागणी हेगिष्टे यांनी केली. एसटी प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या बस वाढवा
आगारातील जुन्या बस लांजा तालुक्यात धावत आहेत. जुन्या गाड्यांमुळे नादुरुस्तीचे प्रमाण वाढत आहे. लांजा आगाराला नवीन बस उपलब्ध कर आणि झयें-मुंबई, भांबेड मुंबई, इसवली-मुंबई एसटी बस वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. लांजा एसटी स्थानकातील प्रवेशद्वारावर खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजवा, अशी मागणी प्रवाशांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 12/Aug/2024
What's Your Reaction?