राज्यावर सात लाख कोटींचं कर्ज असताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला : अंबादास दानवे

Aug 17, 2024 - 15:13
 0
राज्यावर सात लाख कोटींचं कर्ज असताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला : अंबादास दानवे

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojna) विरोधकांनी खळखळ करण्यास सुरुवात केली असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लाडके बहिण योजनेवरून सरकारवर जोरदार टीका केलीये.

आज लाडके बहीण योजना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्च होत असताना राज्य सरकार कर्जबाजारी होत असून विकासाला पैसे नसताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला जात असल्याचं म्हणाले. आज विधानसभानिहाय बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंढरपुरात आले असून विठ्ठल दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यावर सात लाख कोटींचं कर्ज असताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला

राज्य कर्जबाजारी होत असून विकासाला पैसे नसताना लोकप्रिय योजनांकडे पैसा वळवला जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. एका बाजूला शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत. राज्यावर सात लाख 88 हजार कोटींचा कर्ज आहे. पण सरकार मात्र लोकप्रिय योजनांकडे विकासाचा पैसा वळवू लागले आहेत. महाराष्ट्र विकासापासून कोसो दूर जात असल्याची टीका दानवेंनी केली.

महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देण्याची क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये: अंबादास दानवे

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकींचे वारे वाहत असताना मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांनी माघार घेतल्याबाबत दानवेंना विचारले असता, आधी हे महाराष्ट्राला लुटणारे सरकार तर जाऊ दे, मग नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं होणं योग्य नसून यामुळे पाडापाडीचे राजकारण वाढत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात आहे. राज्यात शिंदे यांचे आमदार कमी असूनही त्यांचा मुख्यमंत्री झाला याची आठवण करून देत उद्धव ठाकरे हेच कल्याणकारी सरकारचे नेतृत्व करू शकत असल्याचं साकडे विठुरायाला घातल्याचे दानवे यांनी सांगितलं.

हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न

भाजप गेल्या वर्षीपासून राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, शेवगाव, संगमनेर, कोल्हापूर येथे त्यांनी प्रयत्न केला. मात्र जनतेने त्यांना भीक घातली नसल्याचं दानवे म्हणाले. राज्यात आणि केंद्रात यांचेच सरकार असताना भाजपवाले मोर्चे कशाला काढत आहेत? असा सवाल करत जाणीवपूर्वक महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा, हिंदू मुस्लिम असा भेद निर्माण करून मते मिळवण्याचं काम भाजपवाले करत आहेत असा दावा दानवेंनी केला. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा असून येथील जनतेची विवेक बुद्धी जागी असल्याचे दानवे यांनी सांगितलं. रामगिरी महाराजांच्या नाशिकच्या प्रवचनादरम्यान झालेल्या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. यानंतर आज त्या माध्यमांशी बोलत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow