Maharashtra Band : 'सरकार कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करेल', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री यांच्यात राजकीय संघर्षय बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
महायुतीचा नाशिकमध्ये मेळावा पार पडला. या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “ही माहिती आताच आम्हाला कळाली. कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवल्याची माहिती मिळाली आहे. कोर्टाने याआधी देखील अशाप्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही सुनावले होते. तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा आग्रह धरत आहेत. या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच भरडला जातो. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, एवढंच मी सांगू इच्छितो. कोर्टाचा निर्णयाचा आदर, अंमलबजावणी सरकार करेल”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांचा भाषणातही इशारा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाशिकच्या भाषणातही याबाबत भाष्य केलं. “पुरोगामी महाराष्ट्र आहे. मतांसाठी, सत्तेसाठी एवढ्या खालच्या स्तरावर जावून तुम्ही प्रचार करत आहात. तुम्ही खरंच संवेदनशील असाल तर अशा दुर्देवी घटनांचं राजकारण करणं बंद करा. महाराष्ट्र बंद काय करता, हे राजकारण बंद करा. आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इलिगल बंद म्हटलं आहे. अशाप्रकारे अनधिकृत बंद करता येणार नाही, अशी चपराक कोर्टाने दिलेली आहे. तुम्हाला मागेही कोर्टाने दंड लावला होता. त्यातून तरी सुधरा. माझ्या बहिणी हे राजकारण खपवून घेणार नाही. सत्तेला हापापलेले बंदच्या निमित्ताने कायदा-सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंदमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जाते. त्यामुळे लोकांना वेठीस धरु नका”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाशिकचा कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यानंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली. “नेपाळमध्ये जी दुर्घटना झाली आहे, त्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातील नागरीक आहेत. माझी चीफ सेक्रेटरींशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांचं देखील बोलणं झालं आहे. चीफ सेक्रेटरींनी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरींसोबत बातचित केली आहे. बॉर्डरवर आपले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा झालेली आहे. सर्वप्रकारे मदत देण्याचा आपला प्रयत्न आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने मृतदेह महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 23-08-2024
What's Your Reaction?