अणुस्कूरा घाट बंदीचा वाहनचालकांना भुर्दंड
राजापूर : अणुस्कुरा घाटमार्गामध्ये पडलेली दरड पूर्णपणे हटविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही यश आलेले नसल्याने घाटमार्ग बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून घाटमाथ्यावर जा-ये करण्यासाठी राजापूर-पाचल भुईबावडा-गगनबावडा-कोल्हापूर या पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे. अणुस्कूरा घाट बंद असला तरी घाटमाथ्यावरून येणारा किराणामाल भाजीपाल्यावर परिणाम झालेला नाही.
पाचल-गगनबावडा-कोल्हापूर हा पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी वेळ आणि पैशाच्यादृष्टीने काहीसा खर्चिक ठरत असल्याने त्याचा नाहक भुर्देड त्यांना सहन करावा लागत आहे. कोल्हापूरसह घाटमाथा परिसर जवळ असल्याने तेथील मोठ्या बाजारपेठेतून घाऊक प्रमाणात किराणा माल, विविध कडधान्य, कापड दुकानातील साहित्य, बांधकामासाठी लागणारे साहित्य यासह अन्य साहित्याची तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात मागणी केली जाते. घरोघरी आणि हॉटेलमध्ये दैनंदिन मागणी असलेल्या नाशवंत मालापैकी दुधासह भाजापीलाही मोठ्याप्रमाणात कोल्हापूर भागातून तालुक्यात येतो. गणेशोत्सवजवळ आल्याने या काळात या वस्तूंची मोठ्याप्रमाणात मागणी आणि त्यातून, उलाढाल असल्याने या वस्तूंचा आणून ठेवून त्याचा साठा करण्यावर व्यपाऱ्यांचा भर आहे. अणुस्कूरा घाटाऐवजी तालुक्यात येण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग असल्याने येथील या वस्तू वा साहित्य कोल्हापूर भागातून येण्यामध्ये फारसे अडथळे येत नाहीत. त्यामुळे गेल्या चोवीस तासाहून अधिक काळ अणुस्कुरा घाटरस्ता बंदस्थितीचा फारसा प्रतिकूल परिणाम झाला नसल्याची माहिती येथील एका व्यापाऱ्याने दिली.
पर्यायी मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक
दरड कोसळल्याने अणुस्कुरा घाटमार्ग बंद असल्याने वाहन चालकांकडून राजापूर-भुईबावडा-कोल्हापूर अशा पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे. पाचल अणुस्कुरा कोल्हापूर हे अंतर सुमारे सत्तर किमी आहे. पाचल-गगनबावडा-कोल्हापूर हे सुमारे नव्वद किमी अंतर होत असल्याने वाहनचालकांना पाचल-भुईबावडा- गगनबावडा-कोल्हापूर असा सुमारे वीस किमीचा जादा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास वेळ आणि पैशाच्यादृष्टीने वाहनचालकांसाठी खर्चिक ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 26/Aug/2024
What's Your Reaction?