राजापूरमध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना विविध लाभांचे वितरण
रत्नागिरी : नोंदित बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक लाभ देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून गरिबांना ताकद देण्याचे काम शासन करीत आहे.
कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्या वतीने राजापूर तालुक्यातील नोंदित बांधकाम कामगारांना पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंचे वाटप बुधवारी राजापूरच्या शिवाजी नाट्यगृहात करण्यात आले.
पालकमंत्री म्हणाले, कामगार विभागामार्फत मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी नोंदणी करणे गरजेचे आहे. योजनामधून प्राथमिक शिक्षणासाठी २ हजार ५०० रुपये, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये, दहावीनंतरच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये, अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये मिळतात. त्यामुळे आपण स्वत: नोंदणी करण्यासाठी तसेच इतरांना, आपल्या शेजाऱ्यांनादेखील नोंदणीबाबत सांगण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले.
सत्यवान शंकर भुते, दत्तगुरु मारुती दांडेकर, श्रावणी विकास गावकर, सचिन विजय भुते यांना यावेळी गृहोपयोगी वस्तू आणि सुरक्षा संचांचे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कुलदीप राजाराम सुर्वे या नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने तेजस्वी कुलदीप सुर्वे यांना २ लाखांचा धनादेश, विजय अनंत शील यांना त्यांचा मुलगा विनीत शील याच्या उच्च शिक्षणासाठी ६० हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहाय्यक आयुक्त कामगार संदेश आयरे, परिवीक्षाधीन अधिकारी निशिगंधा रसाळ, तहसीलदार शीतल जाधव, सरकारी कामगार अधिकारी राजेश जाधव, राहुल पंडित, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 29-08-2024
What's Your Reaction?