राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे बुजवले
राजापूर : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुषार पाचलकर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचल बाजारपेठेसह अन्य भागातील खड्डे आज भरण्यास सुरुवात केली, मात्र, ही मलमपट्टी तात्पुरतीच ठरणार आहे.
केवळ दगड फोडून खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काल खड्डे भरण्यात आल्याने आणि पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा खड्डे व्यवस्थितरीत्या बुजवण्यात येणार असल्याचे लेखी पत्र बांधकाम विभागाने दिल्याने पाचलकर यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पाचल भागातील गावांना जोडण्यामध्ये ओणी-अणुस्कुरा मार्गाची भूमिका महत्त्वाची आहे. कोल्हापूर भागामध्ये जाणारी वाहने याच मार्गावरून जा-ये करत असतात. गणेशोत्सवामध्येही अनेक चाकरमान्यांनी कोकणामध्ये येण्यासाठी ओणी-अणुस्कुरा घाटमार्गे या रस्त्याचा उपयोग केला; मात्र या मार्गावर ओणी, दैतवाडी, सौदळ, खडीकोळवण, येळवण, रायपाटण, पाचल बाजारपेठ आदी भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड़े चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. हे खड्डे तत्काळ बुजवण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पाचलकर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत बांधकाम विभागाकडून खड़े बुजवण्याला सुरुवात झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 9/11/2024
What's Your Reaction?