रत्नागिरीतील ७ पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

Sep 12, 2024 - 16:58
 0
रत्नागिरीतील ७ पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

रत्नागिरी : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरी शहरातील पुतळ्यांबाबत पालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी रत्नागिरी शहरातील सात पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये पुतळ्यांचा पाया, चबुतरा, पुतळा किती मजबूत आहे, दुरुस्तीची गरज आहे का याचा अहवाल ही संस्था देणार आहेत.

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सर्वच पुतळ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. पालिका, महापालिकांनी शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार रत्नागिरी पालिकेने शहरातील सात पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक जन्मस्थान येथील टिळकांच्या पुतळ्याचा समावेश आहे. टिळकांचे जन्मस्थान पालिकेच्या हद्दीत असले तरीही ते पुरातत्त्व विभागाकडे आहे. त्यामुळे त्या पुतळ्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. माळनाका येथील शामराव पेजेंचा पुतळाही खूपच जुना आहे. त्याचेही सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर आहेत.

शहरातील मध्यवर्ती असलेल्या मारूती मंदिर सर्कलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरुढ पुतळा अनेकांचे आकर्षण आहे. हा पुतळा २५ वर्षांपूर्वीचा असून २०२२ मध्ये नुतनीकरणावेळी शिवसृष्टीही उभारण्यात आली आहे. सुमारे पावणे दोन कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात आला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टने हे काम केले. शहरातील मुख्य रस्त्यावरील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा २५ वर्षांपूर्वीचा आहे. त्या पुतळ्याच्या सर्कलचे सुशोभीकरण केले आहे. त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च केले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मीचौक येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा २५ ते ३० वर्षांपूर्वीचा जुना आहे. तिथे जे. जे. स्कूल ऑफ आर्टने म्युरल्स उभारलेले आहे. त्यावर ४० लाख खर्च केले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीतील जिजामाता उद्यानात सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी निधी दिला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचे लोकार्पण झाले. माळनाका येथील शिर्के उद्यानात फेब्रुवारीमध्ये विठ्ठलाची सर्वांत मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे. त्यावर एक कोटी रुपये खर्च केले आहेत. या सर्व पुतळ्यांचे पर्यटकांसह रत्नागिरीकरांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे हे सर्व पुतळे सुरक्षित राहावेत यासाठी पालिकेने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील कॅलिबर काँक्रिट सोल्युशन या संस्थेची नेमणूक केली आहे. हे काम लवकरात लवकर करावे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत.

शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. नेमलेल्या एजन्सी ज्या उपाययोजना सूचवतील त्या तत्काळ करून घेतल्या जाणार आहेत. - तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow